Swaraj Kaushal Passes Away: भारताच्या राजकारणातील एक मोठे आणि आदराने पाहिले गेलेले व्यक्तिमत्त्व, माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील, ज्येष्ठ वकील स्वराज स्वराज कौशल यांचे गुरुवारी (४ डिसेंबर) वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. दिल्ली भाजपने ‘X’ (ट्विटर) पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. दिल्ली भाजपने दिलेल्या माहितीनुसार, स्वराज कौशल यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी दिल्लीतील लोधी रोड स्मशान घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. स्वराज कौशल यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. देशाच्या इतिहासात सर्वात कमी वयात राज्यपाल बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९९० मध्ये त्यांना मिझोरमचे राज्यपाल बनवण्यात आले, तेव्हा त्यांचे वय अवघे ३७ वर्षे होते. याशिवाय, ते १९९८ ते २००४ या काळात हरियाणातून राज्यसभेचे खासदारही होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून अनेक हाय-प्रोफाइल खटले लढवले. त्यांचा जन्म १२ जुलै १९५२ रोजी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे झाला होता. वडील स्वराज कौशल यांच्या निधनानंतर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी ‘X’ वर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली. “पापा स्वराज कौशल जी, आपले प्रेम, आपले अनुशासन, आपला साधेपणा, आपले राष्ट्रप्रेम आणि आपले प्रचंड धैर्य माझ्या जीवनातील अशी प्रकाशकिरणे आहेत जी कधीही मंद होणार नाहीत. आपले जाणे माझ्या हृदयाची सर्वात खोल वेदना बनून उतरले आहे, पण मन याच विश्वासाने दृढ आहे की आपण आता आईसोबत पुन्हा भेटला आहात, देवाच्या सान्निध्यात, शाश्वत शांततेत. आपली मुलगी असणे हा माझ्या जीवनाचा सर्वात मोठा अभिमान आहे. आपला वारसा, आपली मूल्ये आणि आपले आशीर्वादच माझ्या पुढील प्रत्येक प्रवासाचा आधार राहतील.” सुषमा-स्वराज यांची राजकीय प्रेमकथा – ‘आरएसएस’चे राष्ट्रवादी विचार मानणाऱ्या सुषमा शर्मा आणि समाजवादी विचारसरणीच्या स्वराज कौशल यांची भेट कायद्याच्या अभ्यासादरम्यान झाली. सर्वोच्च न्यायालयात एकत्र प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आणीबाणीच्या काळात, १३ जुलै १९७५ रोजी त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरुवातीच्या विरोधामुळे काही अडचणी आल्या, तरी अखेरीस त्यांचा विवाह झाला. आणीबाणीच्या काळात सोशलिस्ट नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील ‘डायनामाइट’ खटला लढवण्यासाठी स्वराज आणि सुषमा एकत्र कोर्टात जात असत. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत सुषमा स्वराज यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या वतीने प्रचार करत “जेल का फाटक टूटेगा, जॉर्ज हमारा छूटेगा” हा गाजलेला नारा दिला होता, ज्यामुळे जॉर्ज यांचा विजय झाला होता. स्वराज कौशल यांच्या निधनाने राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रात शोककळा पसरली आहे.