-माधव विद्वांस
स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 (मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके 1825) रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथे झाला. त्यांचे मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले. स्वरूपानंदांचे पूर्वज गोविंदभट गोडबोले रत्नागिरी जवळील कासारवेली गावातून पावसला आले. तेथे त्यांचे पूर्वज भिक्षुकी करीत असत.
स्वरूपानंद यांचे आजोबा परशुरामपंत हे शिक्षण खात्यात अधिकारी होते. त्यामुळे शिक्षणाची महती त्यांना कळली असल्याने पुढील पिढीसाठी शिक्षणाची दारे उघडी झाली. परशुरामपंतांचे दुसरे पुत्र विष्णुपंत व रखमाबाई यांच्या पोटी स्वरूपानंद यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. वर्ष 1919 मध्ये ते पुढील शिक्षणाकरता मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या आंग्रेवाडीतील विद्यालयात दाखल झाले. त्यांनी पुण्याच्या टिळक महाविद्यालयात वाङ्मयविशारद पदवी प्राप्त केली. त्यांचे आध्यात्मिक वाचन आणि अभ्यासही चालू होता. त्याचवेळी स्वातंत्र्य लढ्याचे वारे वाहू लागले होते. प्रत्येक तरुणाच्या मनात पारतंत्र्याची सल होतीच. तरुणाई नवचैतन्याने भारून गेली होती.
तशात त्यांनीदेखील गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेतला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी पावसमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले. त्यांनी राष्ट्रोद्धारासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखली. स्वरूपानंद यांनी “स्वावलंबनाश्रम’ नावाची शाळा वर्ष 1923 मध्ये स्थापन केली आणि त्यातून तरुणांना विविध प्रकारचे स्वावलंबासाठी उपयुक्त असे शिक्षण देण्यास सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात त्यांच्यात विरक्ती निर्माण झाली व त्यांना सद्गुरूकृपेची आस लागली. ते जाणून त्यांचे मामा केशवराव गोखले हे त्यांना घेऊन सद्गुरू गणेश नारायण ऊर्फ सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्याकडे घेऊन गेले. वर्ष 1923 मध्ये त्यांनी बाबा महाराजांचा अनुग्रह घेतला व त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. बाबा महाराजांनी अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण “स्वरूपानंद’ असे केले. अनुग्रहानंतर स्वामींनी संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून गुरूंना अर्पण केली. संस्कृत गीतेतील मूळ 700 श्लोकांवर ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये 9 हजार ओव्यांची “ज्ञानेश्वरी’ लिहिली आणि स्वामींनी सोपेपणाने 20 हजार ओव्यामध्ये “अभंग ज्ञानेश्वरी’ लिहिली.
त्यानंतर इंग्रजांनी सर्व राष्ट्रीय शाळांवर बंदी आणली. त्यामुळे स्वरूपानंद स्वावलंबनाश्रम बंद करून उर्वरित विद्यार्थ्यांसह उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले. स्वामींनी 1932 च्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. त्यासाठी कोंकणात दौरे काढून सत्याग्रही मिळवले. त्यामुळे त्यांना अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात झाली.
येरवडा कारागृहात स्वरूपानंद यांना आचार्य जावडेकर, एस. एम. जोशी, शंकरराव देव अशा विभूतींचा सहवास लाभला. कारागृहात मिळालेल्या एकांतवासाचा उपयोग ध्यानासाठी केला. कारागृहातच “नवरत्नहार’ या काव्याची त्यांनी सद्गुरू स्तवनपर रचना केली. वर्ष 1935 मध्ये ते पावस येथे आले. तेथे गीतेवरील “भावार्थ गीता’ हा अनुवाद लिहिला. पारमार्थिक साहित्याची निर्मिती केली. स्वामी 15 ऑगस्ट 1974 रोजी समाधीस्त झाले. त्या जागेवर भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.