Swachh Survekshan 2026 – स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान छरीशपवीर चेवळ यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संकल्पनेला बळ देत केंद्र व राज्य शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला इंदापूर नगरपरिषदेने व्यापक स्वरूपात सुरुवात केली आहे. शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी आणि विकासाभिमुख करण्यासाठी प्रशासन विविध स्तरांवर प्रभावी उपाययोजना राबवत असून, या अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक व नैतिक बांधिलकी असल्याचे स्पष्ट करताना नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले की, माझे शहर, माझी जबाबदारी ही भावना प्रत्येक इंदापूरकरांच्या मनात निर्माण झाली तर शहराला देशपातळीवर पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळविणे सहज शक्य होईल. शहरातील प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच द्यावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरी सुविधा बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. इंदापूर नगरपरिषद. केंद्र व राज्य शासनाच्या या अभियानांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन इंदापूर शहर स्वच्छतेच्या चळवळीत अग्रेसर करावे, असेही आवाहन नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले. इंदापूर शहराने यापूर्वीच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले होते. तत्कालीन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या कार्यकाळात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहराला देशपातळीवर तब्बल 22 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवून दिले होते. या निधीतून शहरातील रस्ते, सार्वजनिक स्वच्छता सुविधा, आरोग्यविषयक कामे आणि मूलभूत नागरी विकासकामांना मोठी चालना मिळाली होती. यंदाच्या मोहिमेतही इंदापूर शहराने उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करावा, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने शहरभर व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. विविध प्रभागांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जात असून व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचतगट, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संघटनांना मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. “स्वच्छ शहर हीच प्रगतीची खरी ओळख आहे. नागरिक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून इंदापूर शहर स्वच्छतेत आदर्श निर्माण करू शकते. स्वच्छता अभियानात नागरिकांनी दिलेले योगदान हे शहराच्या विकासाचे भक्कम पाऊल ठरणार आहे.” – भरत शहा, नगराध्यक्ष