शिवसेना आमचीच असा दावा करत एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या ठाकरे आणि शिंदे गटांना निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयाने मोठा धक्का दिला आहे. आयोगाने शनिवारी रात्री तात्पुरता निर्णय जाहीर करत दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केली आहे. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही तात्पुरतंगोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंनी ट्विट केले की,”आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही, डाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही” मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू” अशा आशयाचं ट्विट अंधारेंनी केलं आहे.
धनुष्यबाण चिन्ह गोठण्याचा निर्णय हा विधानसभेच्या एका जागेसाठी पुढील महिन्याच्या प्रारंभी होणाऱ्या पोटनिवडणुकीपुरता मर्यादित असणार आहे. पण, त्या निर्णयामुळे तूर्त तरी शिवसेना कुणाचीच नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेतील बंडामुळे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. त्यानंतर शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली.
“आम्ही हरलो म्हणजे
तुम्ही जिंकलात असं होत नाही
डाव तुमच्या हातात असला तरी
जिंकता तुम्हाला येत नाही”
मोदी-शहा जी फडणवीसजीतुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती.
पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू— SushmaTai Andhare (@andharesushama) October 8, 2022
अशात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. ती पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. त्या पोटनिवडणुकीमुळे निवडणूक आयोगाच्या दारात पोहचलेल्या पक्षचिन्हाच्या लढाईला आणखी वेग आला. त्यानंतर आयोगाने अंतरिम निर्णय जाहीर केला. आता शिवसेना नाव वापरण्यास मनाई करण्यात आल्याने दोन्ही गटांना नवी नावे धारण करावी लागणार आहेत. आयोगाने दोन्ही गटांना तीन पर्यायी नावे आणि तीन पक्षचिन्हं सुचवण्यास सांगितले आहे. त्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.