कोल्हापूर (प्रतिनिधी) – भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची प्रतिमा मलिन करण्याचा पद्धतशीरपणे डाव सुरू आहे. सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरील माइक बाजूला करणे, चिट्टीवर लिहून देणे या प्रकारातून मराठा समाज नेतृत्व करण्यास सक्षम नाही हे दाखवण्यासाठी भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण हे महाराष्ट्रद्रोही असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघावर भाजप दावा करत शिंदे गटाला संपविण्याचे धोरण भाजपचे असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राज्यात महाप्रबोधनयात्रा सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुजित मिणचेकर होते.
सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार घाणेरडे व सुडाचे राजकारण करत आहे. महाराष्ट्राला कंगाल बनवण्याचे कारस्थान आखले जात आहे. महाराष्ट्र अस्थिर करुन राज्यातील गुंतवणूक दुसरीकडे वळविण्याचा कुटिल डाव आहे. राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातला जात असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का ? ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे ? असा खडा सवाल त्यांनी केला.
किरीट भाऊंच्या नावाचा गंडा बांधते
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेताना सुषमा अंधारे म्हणाल्या, किरीट सोमय्या यांनी मुंबईतील नारायण राणे यांचा अनधिकृत बंगला पाडून दाखवावा. यापूर्वी सोमय्या यांनी आरोप केलेल्या खासदार भावना गवळी, यशवंत जाधव व इतर मंडळीवर अद्याप चार्जशीट का दाखल केले नाहीत, याचे उत्तर द्यावे. या साऱ्यांची उत्तरे दिली तर मी शिवबंधन बाजूला ठेवून किरीट भाऊंच्या नावाचा गंडा बांधते.