पुणे – जनाई-शिरसाई योजनेअंतर्गत पाइपलाइन वितरण प्रणाली राबविण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. लवकरच या संदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
कालव्याऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा केल्यास प्रकल्पाची सध्याची कार्यक्षमता पन्नास टक्क्याहून 77 टक्केपर्यंत वाढू शकणार आहे. मात्र, यासाठी 450 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
पुरंदर तालुक्यातील शेतजमिनीला पाणी पुरविण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजना कार्यान्वित झाल्या असून या योजनेसाठी खडकवासला प्रकल्पातून 3.6 टिएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेने खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित केल्यामुळे जनाई-शिरसाई योजनेला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत मिळत नाही.