Fireworks Sales : फटाके विक्रीवरील बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवरील बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की येथील वायू प्रदूषण बऱ्याच काळापासून धोकादायक पातळीवर आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्या. अभय ओक आणि न्या. उज्जल भुईंया यांच्या खंडपीठाने म्हटले की, रस्त्यांवर काम करणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होतो. प्रत्येकालाच त्यांच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्याची सुविधा नसते.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘गेल्या सहा महिन्यांत, या न्यायालयाने अनेक आदेश दिले आहेत जे दर्शवितात की दिल्लीतील वायू प्रदूषणाची परिस्थिती खूपच वाईट आहे. राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत आरोग्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, ज्यामध्ये स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे.
सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की हिरव्या फटाक्यांमुळे प्रदूषण खूप कमी होते, तोपर्यंत या बंदीचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील विलक्षण परिस्थितीमुळे, फटाक्यांवर बंदी घालणे अत्यंत आवश्यक आहे.





