कोलकता – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर गरज भासल्यास कॉंग्रेस सरकार स्थापनेसाठी तृणमूल कॉंग्रेसला पाठिंबा देईल, अशी भूमिका त्या पक्षाच्या ज्येष्ठ खासदाराने मंगळवारी मांडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ते वक्तव्य कॉंग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे ठरण्याची शक्यता आहे.
यावेळची बंगाल निवडणूक अधिक चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. त्या राज्यात प्रामुख्याने तृणमूल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे. अर्थात, कॉंग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडीमुळे त्या लढतीला तिरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, कुणालाच स्पष्ट बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काय घडणार, याविषयी आतापासूनच वेगवेगळे आडाखे मांडले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेसचे खासदार अबू हासेम खान चौधरी यांनी राजकीय चर्चांना आणखी खमंग फोडणी देणारे वक्तव्य केले. जातीयवादी राजकारण करणाऱ्यांपासून कॉंग्रेस पक्ष दूर राहतो. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजप आणि तृणमूल या पर्यायांपैकी एकाची निवड करायची झाल्यास आमचा पक्ष तृणमूलला पसंती देईल. अर्थात, ते माझे वैयक्तिक मत आहे, असे चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे बंगालमध्ये निवडणुकीनंतर महाराष्ट्र पॅटर्न उदयास येणार का, अशा चर्चांना तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे पक्ष एकत्र आले.