Jamkhed News : मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; ४ सप्टेंबरला जामखेड शहर-तालुका बंदची हाक
Jamkhed News : मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असताना शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका अखंड मराठा समाजाने मांडली आहे.

जामखेड : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले असून, उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत असल्याने जामखेड तालुक्यातील अखंड मराठा समाजाने चिंता व्यक्त केली आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि. ०४ सप्टेंबर २०२६ रोजी जामखेड शहर व तालुका बंद ठेवण्याचा निर्णय अखंड मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
याबाबत अखंड मराठा समाज, जामखेड तालुका यांच्या वतीने तहसीलदार, जामखेड यांना निवेदन देण्यात आले.मराठा आरक्षणाच्या प्रश्नासह समाजाच्या विविध मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करून तात्काळ ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असताना शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका अखंड मराठा समाजाने मांडली आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जामखेड बंदमध्ये व्यापारी, व्यावसायिक, नागरिक तसेच सर्व समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेणे, मनोज जरांगे पाटील यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेणे, त्यांच्या प्रकृतीचा गांभीर्याने विचार करणे तसेच मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करणे, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
“शासनाने आता केवळ आश्वासने न देता मराठा समाजाच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा,” अशी ठाम मागणी अखंड मराठा समाज, जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने मराठा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने उभा राहणार असल्याचेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.





