Satara News : रहिमतपूरचा गड राखण्याचे सुनील मानेंसमोर आव्हान; महायुतीच्या माध्यमातून विरोधक एकवटणार का?

रहिमतपूर : रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. रहिमतपूर पालिकेवर निर्विवाद सत्ता गाजवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासमोर यावेळी हा गड राखण्याचे आव्हान आहे. यावर्षी होणार्या निवडणुकीत सुनील माने यांचेच नेतृत्व रहिमतपूरकर स्वीकारणार की, विरोधकांना यश मिळणार, याची चर्चा सुरू आहे.
रहिमतपूर पालिकेच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष वासुदेव माने भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा माने-कदम व माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांचाही दबदबा अनेक वर्षांपासून आहे. सुनील माने यांच्याकडील पालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी 2011 च्या निवडणुकीत जनता परिवर्तन आघाडीचा प्रयोग झाला होता.
त्या निवडणुकीत सुनील मानेंच्या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन, जनता परिवर्तन आघाडी स्थापन केली होती. या आघाडीने सुनील माने यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडीपुढे आव्हान उभे केले होते; तरीही सत्ता कायम ठेवण्यात सुनील माने यांना यश आले होते. नंतरच्या कालावधीत जनता परिवर्तन आघाडीत फाटाफूट झाली. 2016 च्या झालेल्या निवडणुकीत सौ. चित्रलेखा माने-कदम यांनी सुनील माने यांच्या नगरविकास आघाडीत प्रवेश करत, ‘हम साथ साथ है’चा नारा दिला होता. वासुदेव माने हेसुद्धा काही काळ राष्ट्रवादीच्या जवळ वावरत होते; पण हा प्रयोगसुद्धा जास्त काळ टिकला नाही.
गेल्या दहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर वासुदेव माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा उचलून धरला आहे, तर सौ. चित्रलेखा माने-कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून घेतली आहे. संपतराव माने आणि त्यांचे सुपुत्र तथा माजी विरोधी पक्षनेते नीलेश माने यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुनील माने यांच्या विरोधातील सर्वच नेते सध्या महायुतीत आहेत. त्यामुळे पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी हे नेते एकत्र येऊन, जनता परिवर्तन आघाडीचा प्रयोग पुन्हा राबवणार का, याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
नगरविकास आघाडीसमोर आव्हान
सुनील माने यांनी कोरेगावच्या तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील यांच्या ताकदीवर पालिकेत सत्ता मिळवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेतेमंडळींचा सुनील माने यांच्यावर वरदहस्त होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत सामील झाल्यानंतर, सुनील माने त्यांच्या गोटात जाणार, अशी चर्चा होती; परंतु माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची पाठराखण करत सुनील माने हे शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत.त्यामुळे आगामी निवडणुकीत व त्यानंतरच्या कालावधीत अजितदादा आपली ताकद सुनील माने यांच्या पाठीशी उभी करतील का, याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. पालिका निवडणुकीत महायुतीचा प्रयोग झाला, तर अजितदादांचे कट्टर समर्थक सचिन बेलागडे हे महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा आहे.
आ. मनोज घोरपडे निवडणूक ताकदीने लढवणार
आ. मनोज घोरपडे हे रहिमतपूरचे जावई असल्याने, पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी ते ताकद लावणार, हे ठरलेले आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदारकीच्या माध्यमातून विकासकामांसाठी सुनील माने यांना साथ दिली; परंतु मनोज घोरपडे हे आमदार झाल्याने, त्यांची मदत सुनील माने यांना होणार नाही. त्याचा फटका माने यांना बसणार आहेत. वासुदेव माने यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून रहिमतपूरमध्ये विकासकामांचा सपाटा सुरू केला आहे. नीलेश माने यांनीही मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे खेचून आणली आहेत, तर सौ. चित्रलेखा माने-कदम ह्या राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या जवळ राहून, रहिमतपूरच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. ही सर्व गोळाबेरीज केल्यास, पालिकेवरील वर्चस्व राखण्यासाठी सुनील माने यांना संघर्ष करावा लागणार, हे निश्चित आहे.
सुनील माने यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न?
राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सामील झाले. मात्र, सुनील माने हे शरद पवार यांच्या गटात राहिल्याने अजित पवार यांची त्यांच्यावर नाराजी आहे. खासदार नितीनकाका पाटील यांनी कोरेगाव तालुक्यात लक्ष घालून राष्ट्रवादी अजितदादा गट वाढवण्यावर भर दिला आहे. रहिमतपूर व परिसरातील अनेक गावांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सक्रिय आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सुनील माने हे संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी फिरले होते. त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची धुरा समर्थपणे सांभाळली; परंतु जिल्ह्यात महाविकास आघाडी भुईसपाट झाली. त्याचा फटका सुनील माने यांना बसणार का? शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, नितीनकाका पाटील, मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची ताकद रहिमतपूर पालिकेत सुनील माने यांना कोंडीत पकडण्यासाठी लागल्याची चर्चा आहे.





