Sunetra Pawar – बारामतीची पोटनिवडणुकीला वैयक्तिक लढत न मानता ती बारामतीकरांची सामूहिक लढाई आहे. जसे आतापर्यंत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली तसेच आता बारामती आणि राज्यातील जनतेची जबाबदारी उचलण्यास मी सज्ज आहे, अशी ग्वाही महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. राजकारणात कार्यकर्त्यांच्या भूमिकेला नेहमीच महत्त्व दिले जाते. मात्र, अनेक वेळा प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत असते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देत संघटनात्मक बदलांची दिशा अधोरेखित केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री (स्व) अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात महायुती- महाविकास आघाडीत पोटनिवडणुकीवरून चांगलेच रण तापले होते. बारामती विधानसभा पोटनिवडणूक. कन्हेरी येथे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. पवार म्हणाल्या. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या नाहीत तर जे खऱ्या अर्थाने पक्षासाठी आणि जनतेसाठी काम करतात. त्यांना योग्य न्याय दिला जाईल. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या महिला नेतृत्वाविषयी समाजातील दृष्टिकोनावरही भाष्य केले. आजही महिलांच्या नेतृत्व क्षमतेकडे संशयाने पाहिले जाते. मी ही जबाबदारी निभावू शकेन का याबाबत अनेकांना शंका होती. मात्र या सर्व शंकांना उत्तर देण्यासाठी कामातूनच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. अजितदादांच्या आठवणीने उपस्थित भावूक पवार म्हणाल्या, बारामतीच्या विकासात अजितदादांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी घातलेला विकासाचा पाया अधिक मजबूत करणे हे आपले कर्तव्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार याही भावनिक झाल्या. त्यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्ते, नागरिक भावूक झाले होते. विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेसोबतच महिलांच्या नेतृत्वाबाबतचा ठाम संदेश आणि विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला प्रभावी सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.