– नितीन कुलकर्णी
हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला.
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करताना अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या पहिल्या प्रयत्नात नीरजच्या भाल्याने 88.77 मीटर अंतर पार केले. भालाफेकमधील हा त्याचा हंगामातील सर्वोत्तम आणि कारकिर्दीतील तिसरा सर्वोत्तम थ्रो ठरला. त्याच्यासह डीपी मनूने अ गटातील दुसऱ्या प्रयत्नात 81.31 मीटरच्या थ्रोसह तिसरे स्थान पटकावले; तर किशोर जेना याने 80.55 च्या थ्रोसह अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिन्ही भारतीय खेळाडूंनी एकत्रितपणे अंतिम फेरी गाठणे ही एक लक्षवेधी उपलब्धी आहे. भालाफेक प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पूर्वीचे लोक शिकार वगैरेसाठी हे तंत्र वापरत असते; पण त्याच्या लोकप्रियतेमुळे कालोघात त्याचे आंतरराष्ट्रीय खेळात रूपांतर झाले. आज हा खेळ भालाफेक या नावाने प्रसिद्ध आहे. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेला डेकॅथलॉन म्हणतात, तर महिलांच्या स्पर्धेला हेप्टॅथलॉन म्हणतात.
नीरज चोप्रा भारतातील भालाफेकमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनल्यानंतर देशातील अनेक तरुण या खेळाकडे आकर्षित झाले. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकून भारताचे प्रतिनिधित्व केले. यानंतर नीरजने मागे वळून पाहिले नाही. 121 वर्षांपूर्वी भारताने ऍथलेटिक्समध्ये पहिले पदक जिंकले होते. यानंतर नीरज चोप्राने ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहासात आपले नाव नोंदवले.
या तिन्ही भालाफेकपटूंबाबत एक योगायोगाची आणि कृषिप्रधान देश म्हणून अभिमानाची बाब म्हणजे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेले हे यशवंत शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. नीरज चोप्रा हा हरियाणातील एका भात शेतकऱ्याचा मुलगा आहे. किशोर जेना हा ओडिशातील कॉफी उत्पादकाचा मुलगा आहे; तर डीपी मनू हादेखील कर्नाटकातील कॉफी उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आतापर्यंत किशोर जेना आणि मनू यांचे आयुष्य शेतात गेले.
नीरजच्या यशानंतरच त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. किशोर जेना यांनी संकल्प केला होता की जर नीरज हे करू शकत असेल तर आपणही हे करू शकतो. 2017 मध्ये त्याने 72 मीटरचा आकडा गाठला होता. सप्टेंबर 2021 मध्ये त्याने पहिल्यांदा 76 मीटरला स्पर्श केला. त्यानंतर त्याला राष्ट्रीय शिबिरात स्थान मिळाले. मग प्रशिक्षकांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली त्याने अथक परिश्रम केले. हळूहळू त्याची कामगिरी सतत सुधारत राहिली. या वर्षाच्या सुरुवातीला 1 मार्च रोजी बेल्लारी येथे इंडियन ओपन थ्रो स्पर्धेत त्याने 78.93 मीटर दूर भाला फेकला होता.
त्यानंतर सुमारे 19 दिवसांनंतर त्याने त्रिवेंद्रममधील इंडियन ग्रांप्रीमध्ये 81.05 मीटर फेकून 80 मीटरचा टप्पा तोडला. पुढील तीन स्पर्धांमध्ये, तो 80 मीटरचे अंतर पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला, परंतु त्याने आत्मविश्वास गमावला नाही. जूनमध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय स्पर्धेत 82.87 मीटर फेकून त्याने दमदार पुनरागमन केले. त्यानंतर त्याने श्रीलंकन चॅम्पियनशिपमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि 84.38 मीटर फेकून ही स्पर्धा जिंकत जागतिक
स्पर्धेसाठीची पात्रता मिळवली. हा या वर्षातील जगातील 11वा आणि भारतीय भालाफेकपटूचा दुसरा सर्वोत्तम थ्रो आहे.
कर्नाटकात वाढलेल्या मनूकडे प्रशिक्षणासाठी आवश्यक संसाधने किंवा प्रशिक्षक नव्हते. त्याने जागतिक विक्रम प्रस्थापित केलेल्या जॅन झेलेंजी यांचे यूट्यूब व्हिडिओ पाहून भाला फेकण्याचे तंत्रदेखील आत्मसात केले. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेते कांशीनाथ नायक यांनी मनूमधील गुण आणि कसब हेरले. त्यांनी त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर मनूने सर्व उणिवांवर मात करण्यासाठी अफाट परिश्रम केले आणि यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. पैशाची कमतरता देखील त्यांच्यासमोर नेहमीच संकट बनून उभी राहिली, पण ध्यास आणि जिद्द असेल तर सर्व यश प्राप्त होते, असे म्हणतात. 2021 पर्यंत मनूकडे परदेशात जाण्यासाठी पासपोर्टही नव्हता. पण आता त्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही.
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच हजेरी लावणारा भालाफेकपटू किशोर जेनाने चांगली कामगिरी करत ही मालिका पाचव्या स्थानावर संपवली. त्याच्या या कामगिरीचाही सर्वदूर उद्घोष होत आहे. किशोर जेना गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपची तयारी करत होता. यादरम्यान तो दोन वर्षे घरीच गेला नाही आणि नजीकच्या भविष्यातही तो घरी जाईल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही.
किशोर जेना हा ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील कोठासाही गावातील रहिवासी आहे. तो पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर खेळताना दिसला. किशोर पूर्वी व्हॉलीबॉल खेळायचा; पण 2015 पासून त्याने भालाफेकीकडे आपला मोर्चा वळवला आणि अवघ्या 8 वर्षांत गरूडझेप घेतली. शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करू शकतो हा समज या खेळाडूंनी मोडीत काढला आहे. आज हे तिघेही भारतीय तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणा बनले आहेत. त्यांच्यातून प्रेरणा घेत अधिकाधिक भारतीय प्रतिभांना प्रेरणा मिळेल.