Summer Tourism – उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी देश-विदेशात सहलींचे नियोजन करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांचा उत्साह यंदा लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. विमान तिकिटांच्या प्रचंड दरवाढीमुळे आणि जागतिक परिस्थितीतील अनिश्चिततेमुळे पर्यटनाचे बजेट ३० ते ४० टक्क्यांनी वाढले असून, याचा थेट परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर दबाव वाढला आहे. विमानाच्या इंधन दरात मोठी वाढ झाल्याने तसेच पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे विमान कंपन्यांनी तिकीट दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने परदेश प्रवासाचा खर्च आणखी वाढला आहे. परिणामी, मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय कुटुंबांनी यंदा पर्यटनाच्या योजना पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. ट्रॅव्हल एजन्सींना चौकशी येत असली तरी प्रत्यक्ष बुकिंगमध्ये मात्र मोठी घट झाली आहे. पर्यटन हंगाम “स्थिती स्थिर होईपर्यंत थांबूया,” अशी भूमिका अनेकांनी घेतल्याने ‘वेट अँड वॉच’चा ट्रेंड वाढला आहे. विशेष म्हणजे, दुबई, ओमानसारख्या मार्गांवरून होणाऱ्या प्रवासाबाबतही पर्यटकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांमुळे अनेकांनी या मार्गांना टाळण्याचा पर्याय स्वीकारला आहे. दरम्यान, परदेश प्रवास महागल्याने काही पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे कल वाढला असला तरी, तेथेही विमान तिकिटांच्या वाढलेल्या दरांमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पर्यटन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, विमान कंपन्यांवरील दर नियंत्रण हटवल्यानंतर सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात मनमानी दरवाढ होत आहे. यामुळे सामान्य पर्यटकांसाठी पर्यटन हळूहळू महागडे ठरत आहे. जागतिक तणाव आणि विमान तिकिटांच्या वाढलेल्या दरांमुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. विशेषतः परदेश दौरे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असून, याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर स्पष्टपणे दिसत असल्याचे पर्यटन तज्ज्ञांचे मत आहे. महागाई, जागतिक अस्थिरता आणि विमान प्रवासाचा वाढलेला खर्च यामुळे यंदाचा उन्हाळी पर्यटन हंगाम मंदावल्याचे चित्र असून, पर्यटन क्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.