Summer Skin Care: उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या अनेक तक्रारी वाढू लागतात. आपल्या देशात ठिकठिकाणी तापमानात बदल होत असल्यामुळे त्वचेच्या समस्या देखील वेगवेगळ्या दिसतात. पुण्यासारख्या शहरात दुपारी कडक ऊन आणि सकाळी गारवा असतो. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे त्वचा पटकन कोरडी पडते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरडी त्वचा असल्यास खाज येते. खाजवल्याने त्वचेवर जखमा होऊन जंतुसंसर्ग होऊ शकतो. केसही कोरडे व तुटणारे होतात. त्यामुळे त्वचेत ओलावा टिकवणे महत्त्वाचे आहे. शक्यतो कडक उन्हात जाणे टाळावे. आंघोळीला खूप गरम पाणी वापरू नये; कोमट पाणी योग्य असते. साबणाचा वापर मर्यादित प्रमाणात, फक्त घामाच्या भागांवर करावा. साबणाऐवजी शिकेकाई, डाळीचे पीठ किंवा स्क्रब वापरल्यास त्वचा अधिक कोरडी होऊ शकते, त्यामुळे ते टाळावे. आंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा हलके तेल लावावे. त्यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहतो आणि खाज कमी होते. वातानुकूलित कार्यालयात काम करणाऱ्यांची त्वचा अधिक कोरडी पडते. त्यांनी दर तीन-चार तासांनी मॉइश्चरायझर लावणे फायदेशीर ठरते. बाहेर काम करणाऱ्यांनी उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. टोपी, रुमाल, पूर्ण बाह्यांचे सुती कपडे वापरावेत. उन्हाळ्यात सैलसर, फिकट रंगाचे कपडे घालावेत. घट्ट जीन्स किंवा लेगिंग्ज टाळाव्यात. असे कपडे घातल्यास घाम साचतो आणि गजकर्णासारखे बुरशीजन्य आजार वाढतात. सध्या गजकर्णाची साथ वाढलेली आहे. त्यामुळे त्वचा कोरडी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Summer Skincare Routine गजकर्ण झाल्यास स्वतःहून औषधे किंवा स्टिरॉइडयुक्त मलमे वापरू नयेत. त्यामुळे आजार बळावू शकतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपला टॉवेल, साबण आणि कपडे वेगळे ठेवावेत. कपडे रोज धुवून उन्हात वाळवून इस्त्री करून वापरावेत. मोजे रोज धुवावेत आणि बूट हवेशीर ठिकाणी ठेवावेत. मोबाईल, हेडफोन, हेल्मेट यांची स्वच्छता राखावी. उन्हाळ्यात सोरायसिस, इसब, आगवेल यांसारख्या त्वचारोगांची तीव्रता वाढू शकते. उन्हामुळे त्वचेवर टॅन येतो किंवा अॅलर्जी होते. टॅन घालवण्यासाठी वॅक्सिंग केल्याने त्वचेचा वरचा थर निघतो आणि त्वचा अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे योग्य सनस्क्रीन वापरणे अधिक चांगले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सनस्क्रीन निवडावे. तळहाताएवढ्या भागासाठी एक रुपयाच्या नाण्याएवढे सनस्क्रीन पुरेसे असते. ते दर तीन-चार तासांनी पुन्हा लावावे. पोहायला गेल्यानंतर स्वच्छ आंघोळ करून त्वचा कोरडी करावी आणि मॉइश्चरायझर लावावे. काही भागात पाण्यात क्षार जास्त असल्यामुळे त्वचा अधिक कोरडी पडते. शक्य असल्यास अशा पाण्यावर प्रक्रिया करावी. उन्हाळ्यात कांजिण्या, गोवर, नागीण यांसारखे विषाणूजन्य आजारही वाढतात. वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे. केसांचीही काळजी घ्यावी. बाहेर जाताना डोक्यावर रुमाल बांधावा. शॅम्पू आणि हेअर ड्रायरचा अति वापर टाळावा. केसांना तेल किंवा कंडिशनर लावावे. योग्य काळजी घेतल्यास उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या टाळता येतात आणि हा ऋतू आनंदाने घालवता येतो.