मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उपाययोजना करण्यासाठी पाऊल
पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते रोखण्यासाठी राज्य सरकार व सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करुन सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. ही समिती अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणार आहे.
गेल्या काही दिवसांत बेशिस्त वाहतूक, वाहने चालवताना हलगर्जीपणा, अतिवेग यासारख्या निष्काळजीपणामुळे मुंबई-पुणे मार्गावर अपघातांची मालिका सतत सुरू आहे. या अपघातांना नियंत्रित आणण्यासाठी गृह विभागांच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून इतर 12 सदस्य समितीत असतील. मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची ठिकाणे व इतर अपघातांची शास्त्रशुद्ध माहिती एकत्रित करुन सुकाणू समितीतर्फे उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या समितीत गृह सहसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग, परिवहन, रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आदी विभागातील अधिकारी सदस्य म्हणून काम करणार आहेत.
अपघातांचे प्रमाण “जैसे थे’
राष्ट्रीय महामार्गावर अपघात रोखण्यासाठी जुलै 2018 मध्ये सुकाणू समिती नेमण्यात आली होती. मात्र, तरी देखील अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे, राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर नव्याने समित्या नेमण्यात येत आहेत. परंतु, अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना राबवल्याचे दिसत नाही.
समिती काय करणार
अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक सूचना करणार
उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा सक्षम करणार
शास्त्रशुद्ध माहिती संकलित करणार