Sudhir Mungantiwar : पेपर आग्र्यात छापल्याची माहिती नव्हती; मंत्री दादा भुसे यांनी खाजगीत कबूली दिल्याचा मुनगंटीवारांचा दावा
राज्य टीईटीचे पेपर आग्रा येथे छापले जात होते, याची आपल्याला कल्पना नव्हती, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्याला खाजगीत सांगितल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बुधवारी केला.

Sudhir Mungantiwar : राज्य टीईटीचे पेपर आग्रा येथे छापले जात होते, याची आपल्याला कल्पना नव्हती, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्याला खाजगीत सांगितल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बुधवारी केला. त्यांच्या या कबुलीमुळे शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजातील गंभीर त्रुटी उघड झाल्या असल्याचे त्यांनी म्हटले.
विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, शालेय शिक्षण मंत्र्यांनी खाजगीत कबूल केले आहे की, टीईटी परीक्षेचे पेपर आग्रा येथे छापले जात आहेत, याची माहिती त्यांच्या विभागाने त्यांना कधीच दिली नव्हती.
आग्र्याचा महाराष्ट्राशी ऐतिहासिक संबंध आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज तिथूनच निसटले होते, आता तिथेच पेपरफुटीही घडली आहे. आता मंत्री म्हणत आहेत की, परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील आणि प्रश्नपत्रिका इथेच तयार केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजातील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत, असे सांगत त्यांनी सर्व राज्य-स्तरीय परीक्षांचा सर्वसमावेशक आढावा घेण्याची गरज अधोरेखित केली. राज्य सरकारने आयोजित केलेल्या प्रत्येक परीक्षेचे (Sudhir Mungantiwar) सखोल लेखापरीक्षण (ऑडिट) करावे, जेणेकरून त्या परीक्षा निष्पक्षपणे आणि शांततेत पार पडतील याची खात्री करता येईल, तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एक अभेद्य यंत्रणा उभारावी, अशी विनंती आपण मंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी विधिमंडळात टीईटी पेपरफुटी प्रकरणावर चर्चा सुरू असताना मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारला होता. पेपर फुटल्याच्या घटनांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विशेषतः नीट-यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही टीका होत आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.






