महिला व बाल विकास विभाग, अहमदनगर चाईल्ड लाईन व कोतवाली पोलीस यांच्या सतर्कतेमुळे विवाह थांबवण्यात यश
नगर: महिला व बाल विकास विभाग, अहमदनगर चाईल्ड लाईन व कोतवाली पोलीस यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह थांबवण्यात यश आले. अहमदनगर शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील होवू घातलेला बालविवाहाचा धक्कादायक प्रकार वेळीस उघडकीस आल्याने एका अल्पवयीन मुलीचे संरक्षण करणे शक्य झाले.
याविषयी सविस्तर माहिती अशी कि, दि.31 मार्च रोजी अहमदनगर चाईल्ड लाईनच्या मोफत हेल्पलाईनच्या क्रमांकावर तक्रार आली कि अहमदनगर जिल्ह्यातील अक्षदा गार्डन मंगलकार्यालय या ठिकाणी साडे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह 31मार्च रोजी होणार आहे, तक्रार प्राप्त झाल्यावर ताबडतोब महिला व बाल विकास विभाग, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी विभाग व कोतवाली पोलीस स्टेशन यांना संपूर्ण माहिती दिली. त्यांनी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन शहानिशा करून मुलीला ताब्यात घेतले. मुलीचा व मुलीच्या आई-वडीलांना कोतवाली पोलीस स्टेशनला आणले.पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचेसमोर हजार केले.
त्यावेळी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी सुरेश टेळे ,गणेश पुगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सॅम्युअल वाघमारे, सर्जेराव शिरसाठ व मुख्य सेविका कांबळे, चाईल्ड लाईनचे समुदेशक महेश सूर्यवंशी, प्रवीण कदम व मीनाक्षी पवार यांच्यासमक्ष मुलीच्या व मुलाच्या आई – वडील ,लग्न लावणारा ब्राम्हण, मंगलकार्यालयाचा मालक यांना व इतर लोकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती सांगून समज दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी मुला- मुलीचे आईवडील नातेबाईक यांना आपल्या पोलिसी खाक्यात समज देत त्याचा लेखी स्वरूपात जवाब नोंदविला तसेच त्यांना नोटीसहि बजावली. त्यांच्या कुटुंब प्रमुखांनी अल्पवयात लग्न करणार नाही असे वचन प्रशासनातील उपस्थित कर्मचाऱ्यांना यांना दिले व समाजातील होणारे बालविवाहाची प्रथा बंद नक्कीच करु असे आश्वासन दिले.