पुणे : कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर नदीत सोडण्यात येणारे 67.50 टीएमसी पाणी पुन्हा वापरण्यात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षावरून प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
कोयना धरणाचे वाहून जाणारे पाणी सिंचन व पाणी पुरवठ्यासाठी पुन्हा वापरण्यासंदर्भात विधानसभेमध्ये आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पाटील म्हणाले, कोयना धरणातील सुमारे 67.50 टीएमसी पाणी वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमध्ये सोडण्यात येते. यापैकी 2.46 टीएमसी पाण्याचे सिंचन व बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षण आहे.
वीज निर्मितीनंतर उपलब्ध होणारे 67.50 टीएमसी पाणी पुन्हा वापरात आणण्यासाठी अभ्यास प्रगतीपथावर आहे. वीज निर्मितीनंतर नदीत सोडण्यात येणारे पाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रासाठी तसेच मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी करण्याच्या दृष्टीने प्रकल्प राबवण्यासाठी अभ्यास सुरू आहे.