मुंबई – करोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करोनाचा इतका अभ्यास केला की ते दोघे आता जवळपास अर्धे डॉक्टरच झाले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोविडची लागण झाली, पण करोना त्यांच्यापाशी फिरकलाच नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मुंबईत महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने स्तुती केली. अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी वर्षभरातच आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला आहे.
नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली. दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेऊन “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीमही राबवली. यामुळे राज्यातील करोनाचा संसर्ग बऱ्याचअंशी नियंत्रणात राहण्यास मदत मिळाली.
यावेळी अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट केले. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली तरी जनहित हा आमचा समान कार्यक्रम आहेत. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मनात महाविकास आघाडी सरकार चालवायचे हा निर्धार आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी सांगितले.