डॉ. भालचंद मुणगेकर : भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिनी मार्गदर्शन
पुणे – करोनाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार असून, त्याची मोठी किंमत भारतासारख्या विकसनशील देशाला मोजावी लागणार आहे. विकासदरात ऐतिहासिक घसरण होणार आहे. बेरोजगारी वाढणार आहे. अशा काळात नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थी स्वतःच्या कुवतीनुसार छोटे-मोठे उद्योग करून अर्थार्जन करू शकतील, असे सामर्थ्य विद्यापीठांना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावे लागेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. मुणगेकर यांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, सह कार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, व. भा. म्हेत्रे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, भारती विद्यापीठाने केवळ पदवीधर तयार केले नाहीत, देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार केले. करोनाच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी जे योगदान देत आहेत. त्याविषयी आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. करोनानंतर येणारी आव्हाने पेलण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांनी सज्ज असले पाहिजे.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, करोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संशोधनात मानवी समूहाचे अस्तित्व टिकवण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. समाजाचे प्राण वाचविण्याचे काम संशोधनातून झाले पाहिजे, ही काळाची गरज आहे.