Student Protest : ‘आंदोलनात समाजकंटक घुसले होते’ ; CJP आंदोलनातील लाठीचार्जवर पोलिसांचा दावा, सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
Student Protest : विद्यार्थी आंदोलनादरम्यान अतिरिक्त बळाचा वापर केल्याच्या आरोपांसंदर्भात दिल्ली आणि बिहार पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे.

Student Protest : विद्यार्थी आंदोलनादरम्यान अतिरिक्त बळाचा वापर केल्याच्या आरोपांसंदर्भात दिल्ली आणि बिहार पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले असून घटनेचा सविस्तर वृत्तांत दिला आहे. दोन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या कोणत्याही स्वतंत्र चौकशी समितीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, २० जुलैच्या आंदोलनादरम्यान संसदेकडे जाणाऱ्या मोर्चासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. सुमारे ३०,००० लोकांच्या जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी अंदाजे ५,००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. जेव्हा जमावाने जबरदस्तीने बॅरिकेड्स तोडले आणि परिस्थिती चिघळली, तेव्हा कायद्याच्या चौकटीत राहून सौम्य बळाचा वापर करण्यात आला.असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
प्रतिज्ञापत्रात काय नमूद ? Student Protest :
प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या संघर्षात अंदाजे २४० पोलीस कर्मचारी जखमी झाले. सुमारे २०० नागरिकही जखमी झाले. बेशिस्त आणि समाजकंटक घटकांनी विद्यार्थ्यांच्या जमावात घुसखोरी करून परिस्थिती चिघळवली. अशा गुन्हेगारांना ओळखण्यासाठी चेहरा ओळखण्यासारख्या (facial recognition) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
खिळे लावलेल्या काठीच्या मुद्द्यावर दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
दिल्ली पोलिसांनी खिळे लावलेल्या काठीच्या व्हिडिओवरही स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, ती काठी पोलीस अधिकाऱ्याची नसून एका आंदोलकाची होती. त्या काठीवर राष्ट्रध्वज होता. साध्या वेषातील पोलिसांच्या उपस्थितीचे समर्थन करताना, प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेषातील अधिकारी तैनात करण्यात आले होते.
बळाच्या वापराबाबत बिहार सरकारने काय म्हटले? Student Protest :
बिहार सरकारनेही अतिरिक्त बळाच्या वापराचे आरोप फेटाळून लावले आहेत. सिवानमधील गोळीबाराच्या घटनेसंदर्भात परिस्थिती स्पष्ट करताना, प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, जमावाने घेरलेल्या एका कॉन्स्टेबलने आत्मसंरक्षणासाठी एके-४७ मधून हवेत चार गोळ्या झाडल्या. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या निष्काळजीपणाबद्दल त्या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. हत्ती चौकाजवळ जमावाला पांगवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला, ज्यात तीन आंदोलक किरकोळ जखमी झाले.
प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, बिहारमधील दंगलीत एकूण १५७ पोलीस अधिकारी आणि ७ सरकारी कर्मचारी जखमी झाले. ६९ एफआयआर नोंदवण्यात आले आणि ५०० जणांना अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्यातील कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या २२२ विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ७५ अल्पवयीन मुलांना सोडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यात येत आहे.





