पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ पारदर्शकपणे मिळण्यासाठी यापूर्वीच प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक नोंदवून घेण्यात आला आहे. पण, आता प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत राज्य शालेय शिक्षण विभागाने माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार, “आरटीई’ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया, वैयक्तिक लाभाच्या शिष्यवृत्ती योजना यांसह इतर विविध सवलती पुरवल्या जातात. योजनानिहाय डेटाबेस तयार करून तो आधारशी जोडण्यासाठी 31 डिसेंबर 2022 मुदत आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती नोंदणीनुसारच योजनांसाठीचा निधी दिला जाणार आहे. ही सर्व माहिती अद्ययावत ठेवून दररोजच्या उपस्थिती नोंदी अर्थात हजेरीनुसार 1 जानेवारी 2023 पासून संबंधित योजनांना निधी मिळणार आहे. शिवाय, शिष्यवृत्ती योजनाही आधार क्रमांकाशी संलग्नित करूनच थेट विद्यार्थ्याच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.