Mahavikas Aghadi : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेसाठी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आहे, त्यामुळे या जागेवर पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच नावाचा विचार केला जात असल्याची माहिती आहे. पण मविआत सर्धाविक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील दावा केला जात असल्याचे समजते. असे असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद पवार यांच्या नावाला राज्यसभेसाठी विरोध नाही. विधानपरिषदेच्या जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोर धरला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधानपरिषेची निवडणूक लढवण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे मविआतील काँग्रेसकडून राष्ट्रवादीचा विलिनीकरणावर शरद पवारांच्या पक्षाने भूमिका स्पष्ट करावी असा सूर आवळला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार द्यायचा यावर मतमतांतरे होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी या सगळ्यात काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असून आघाडीत १६ आमदार काँग्रेस पक्षाकडे आहेत. राज्यसभेची एक जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि विधानपरिषदेची जागा उद्धवसेनेच्या वाट्याला गेल्यास काँग्रेसच्या हाती काय येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असून, अंतर्गत बैठकीत काय ठरते याकडे लक्ष असणार आहे. निवडणूक आयोगाने 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या जागांसाठी 16 मार्चाला निवडणुका होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. हेही वाचा : Bhigwan Kidnapping Case : अपहरण, व्हिडीओ आता तरुणी पोलिस स्टेशनमध्ये हजर; मध्यरात्री दीड वाजता काय घडलं?