पुणे/मार्केटयार्ड -जैन समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान महातीर्थ श्री सम्मेद शिखरजी देवस्थानला झारखंड सरकारने पर्यटन ठिकाण म्हणून जाहीर केले आहे. त्याविरोधात जैन बांधवांत संतापाचे वातावरण आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला पाठिंबा देत मार्केट यार्डासह शहरातील लक्ष्मी रस्ता, सराफ बाजार, टिंबर मार्केट, गूळ-भुसार येथील सर्व जैन व्यापारी बांधवांनी सहभागी होत, दुकाने बंद ठेवली. “झारखंड सरकारने महातीर्थ श्री सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्राचा निर्णय रद्द करावा,’ अशी जैन बांधवांची प्रमुख मागणी आहे.
या बंदमध्ये मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील जैन व्यापारी बांधवांनीही पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली, अशी माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. याबरोबरच नानापेठ, भवानी पेठ आणि गणेश पेठेसह विविध भागातील जैन व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवल्याची माहितीही बाठिया यांनी यावेळी दिली.
या भारत बंदच्या निमित्ताने पुण्यात बुधवारी सकाळी 11 वाजता जैन बांधवांनी टू-व्हीलर रॅलीचे आयोजन केले. ही रॅली टिंबर मार्केट जैन मंदिरापासून सुरू झाली आणि लोखंड बाजार, नाना पेठ, इंद्रप्रस्थ, सोमवार पेठ, फडके हौद, सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रोड, टिळक रोड, स्वारगेट, मुकुंदनगर, मार्केटयार्ड येथे येऊन दुपारी साडेतीनच्या दरम्यान आदिनाथ सोसायटी येथे रॅलीची शांततेत सांगता झाली. या रॅलीत सुमारे 600 तरुण-तरुणी सहभागी झाले.
येरवड्यातही बंद
झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शहरासह संपूर्ण येरवडा भागातील जैन बांधवांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती, अशी माहिती येरवडा व्यापारी आघाडीचे सचिव नाथमल कावेडिया यांनी दिली. दरम्यान, विश्रांतवाडी, खडकीसह अन्य भागांतही व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सहभाग घेतला.