यशवंतनगर – विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदारांच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न दिसत होता, तो म्हणज ‘दाल में कुछ काला है’. पण इतिहास साक्षी आहे. सत्य कधीच दडपले जात नाही, ते एक ना एक दिवस उघडकीस येतेच. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. येथे तुतारीचा उमेदवार असेल आणि तुतारी वाजवण्यासाठी दोन हातांचे बळ लागते. मला पूर्ण खात्री आहे की, हे बळ फक्त तुतारीलाच मिळेल. आपला किल्ला अभेद्य ठेवण्याची जबाबदारी मावळ्यांची आहे. पाटील आणि कदम कुटुंबीयांचे जुने संबंध यापुढेही अबाधित राहतील, असे प्रतिपादन विश्वजित कदम यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील स्नेहमेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येथे प्रशासन असूनही सामान्यांच्या समस्या सुटत नाहीत. मतचोरी आणि दुबार मतदानाच्या प्रकरणांचा पत्ता नाही. लोकशाहीत दडपशाही सुरू आहे, ती मोडून काढलीच पाहिजे. इतर पक्षांत लोक का जातात हे समजत नाही, पण या मतदारसंघाने राज्याला दिशा दिली आहे. यशवंत विचार जोपासायचा आहे. सध्याची वेळ वेगळी आहे, कोणी नाराज होऊ नका. संधी एकालाच मिळते, त्यामुळे सर्वांनी एकजूट होऊन काम करावे. माझे सर्व घडामोडींवर लक्ष आहे, वेळ आल्यावर हिशेब करणार ही धमकी नाही, आम्ही संस्कृती सोडणार नाही. काँग्रेसला सोबत घेऊन आघाडीच्या वतीने निवडणुकीला धैर्याने सामोरे जायचे आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ‘लोकशाहीवरील विश्वास ढासळतोय, देश-राज्य हुकूमशाहीकडे वळतंय. शेतकऱ्यांवर अन्याय, महिलांवर अत्याचार थांबले पाहिजेत. जबाबदार व्यवस्था बदलायला कोणी पुढे यायला हवे. हा मेळावा त्याची मुहूर्तमेढ आहे. बाळासाहेब पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी गट-तट विसरून हुकूमशाहीविरोधी लढाईला साथ द्या’ – ॲड. स्वाती सोमनाथ पवार या मेळाव्यात संचालक नेताजी चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र पाटील, सुनील जगदाळे, शंकरराव खापे, सोमनाथ पवार, मानसिंगराव जगदाळे, लालासाहेब चव्हाण, सुहास बोराटे, अजितराव पाटील चिखलीकर, सागर पाटील, सिध्दार्थ चव्हाण, प्रशांत यादव, संगीता साळुंखे, शारदा पाटील, ऍड. स्वाती पवार, शुभम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक नेताजी चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन संभाजी चव्हाण यांनी तर आभार नितेश डुबल यांनी मानले.