राजगुरूनगर : तब्बल दहा वर्षांनी होत असल्याने राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीची नागरिकांना मोठी उत्सुकता लागली आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक जनतेतून होणार असल्याने अत्यंत चुरशीची होणार असून राजकीय पक्षांची त्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठा उत्साह आहे. अनेक दिग्गज राजकारणी या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. माजी नगराध्यक्ष या पदासाठी तर माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आल्याने जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्यक्षात कोण निवडणुकीत उतरणार याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीतील घटक पक्ष आणि इतर यांचे तीन पॅनेल होण्याची दाट शक्यता आहे. मतदान २ डिसेंबरला होणार असून नागरीकांना प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर लोकशाही सरकारची प्रतिक्षा आहे. राजगुरूनगर परिषदेची स्थापना सन २०१४ मध्ये झाली. त्यानंतर पुढे एक वर्षांनी २०१५ ला पहीली निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. एकूण १८ जागांपैकी ७ जागा भाजप, २ शिवसेना आणि तब्बल ९ जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले नव्हते. मात्र, निवडून आलेले बहुसंख्य अपक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे समर्थक होते. त्यानंतर अपक्ष व शिवसेनेने मिळून सत्ता स्थापन केली. नगराध्यक्ष अपक्ष असलेले बापु थिगळे झाले होते, तर उपनगराध्यक्षपद शिवसेनेच्या सारिका घुमटकर यांच्याकडे होते. पुढे अडीच वर्षांनंतर सत्तांतर होऊन भाजपचे शिवाजी मांदळे नगराध्यक्ष झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, महाआघाडीतील घटक पक्ष आणि उर्वरित, असे तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत नागरीकांनी अपवाद वगळता बहुदा सर्वच नव्या दमाचे नगरसेवक निवडून दिले होते. यावेळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या गटासाठी निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साह आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, अध्यक्षपदासाठी अद्याप कोणीही उमेदवारी भरलेला नाही नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, शिवाजी मांदळे, राजगुरूनगर बँकेचे जेष्ठ संचालक किरण आहेर, माजी उपसरपंच मंगेश गुंडाळ यांच्यानावाची सध्या जोरदार चार्चा आहे तर ॲड. दीपक थिगळे, पत्रकार एकनाथ सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर आदी इच्छुकांची नावे सध्या चर्चेत आली आहेत. यावेळी दोन सदस्यांचा एक याप्रमाणे नऊ प्रभाग असून, केवळ एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे. अशा एकूण दहा प्रभागांतून २१ नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यात ११ महिला नगर सेवक असणार आहेत. खेड तालुक्यात महायुतीतील पक्षांमध्येही फारसे सख्य नाही. त्यामुळे महायुती आणि महाआघाडी, अशी थेट लढत होण्याची शक्यता तुर्तास कमी आहे. आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, शिंदे गटात नव्याने दाखल झालेले अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा आहे. नवीन अध्यक्ष नगरसेवकांमपुढे आणि त्यांच्या राजकीय नेत्यांपुढे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरी समस्या असल्याने समविचारी सत्ता येणे प्रामुख्याने आवश्यक आहे. चास कमान धरतील पाच वर्षे पूर्ण न झालेली पाणी पुरवठा योजना, शहरातील कचरा प्रश्न, भुयारी गटार, वीज रस्ते आदी प्रश्न गंभीर आहेत. हे सोडवण्याचे मोहटे आव्हान नगराध्यक्ष नागरसेवकांपुढे आहे. मागील काळात राजकीय नेत्यांनी मताचे राजकारण केले. त्यामुळे शहरातील नागरिक आता कोणाच्या मागे उभा राहिल, हे आता तरी निश्चित नाही. मात्र, यावेळी राजगुरूनगर शहरातील सुज्ञ नागरिक प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्तीच्या पक्षाच्या मागे राहील का? कारण यावेळची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशीही होणार असल्याने लक्ष्मी दर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नगरपरिषदेच्या राजकारणात राजकीय सारीपाट मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.