पिंपळे निलख – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी आदी भागात मोठ्या प्रमाणावर पदपथांचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. परंतु चोंधे पाटील जंक्शन येथून सांगवी फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर अक्षरशः रस्त्यापेक्षा पदपथच मोठे झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिकेच्या या अजब कारभाराची नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे. या विस्तृत पदपथांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
हिंजवडी आयटी पार्क व मुंबई-बेंगळुरू महामार्गावर या बाजूने येणारी मोठी वाहतूक पुण्याच्या व नाशिककडे जाण्यासाठी पिंपळे निलख मार्गाने सांगवी फाटा, औंध व पुढे पुण्याच्या दिशेने जाते. या मार्गावर दिवसा ज्या प्रमाणे मोठी वाहतूक असते त्याचप्रमाणे रात्री उशिरा मोठ्या अवजड वाहने, लक्झरी बसेस यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावर साधारण दोन किलोमीटर अंतर असणाऱ्या बीअरटीएस रस्त्यावर दोन्ही बाजूने स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथाची रुंदीकरण सुरू आहे. जवळपास 15 फूट व त्या पेक्षा जास्त पदपथाची रुंदी ठेवण्यात आली आहे. येथे सायकल मार्ग वेगळा करण्यात आला आहे. एकीकडे पदपथ व सायकल मार्ग असणे नागरिकांचा हक्क व नियम आहे. परंतु जर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असणाऱ्या रस्त्याच्या रुंदी एवढा मोठा पदपथ असेल तर तो नक्कीच कुठेतरी चुकीचा आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. पदपथामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहनांना जाण्यासाठी मार्गाची रुंदी कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या बाजूला मात्र नागरिकांना पायी चालण्यासाठी केलेल्या पदपथावर मात्र नागरिकांची संख्या बोटावर मोजता येईल इतकी दिसून येते. त्यामुळे महापालिकेने या मार्गावर पदपथ रुंदीकरणाचा घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याबाबत उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
हा निर्णय घेणाऱ्या संबंधित अधिकारी व अभियंता यांनी नक्की कोणत्या प्रकारे नियोजन केले हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असून, दुसऱ्या बाजूला रस्त्याची रुंदी कमी करण्यामागे नेमके कोणते शास्त्र अमलात आणले जात आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. प्रशासनाच्या अशा कारभारावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या रस्त्याच्या रुंदी एवढे पदपथ न ठेवता रस्त्यांची पुन्हा एकदा पाहणी करून रुंदी वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.