प्रभात वृत्तसेवा नांदुर – भूमी अभिलेख यांच्याकडे रेल्वेने सर्व दौंड तालुक्यातील बाधित सर्वे नंबर, गट नंबर, यांची मोजणी करून रेल्वेची जागा निश्चित करावी आणि त्यानंतरच पुढील काम सुरू करावे,असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.दौंड तालुक्यातील सहजपूर, बोरीबडक व इतर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीत सुरू असलेल्या रेल्वे कामाबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दौंड तहसील कार्यालयात दि २४ रोजी महत्त्वपूर्ण बैठक बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची रेल्वे संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सुशांत दरेकर, सह अर्जदार सचिन भगत व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार ममता (भंडारी) देशमुख, भुमिअभिलेख विभागाचे अधिकारी शाम ताथवडकर, रेल्वेचे सीनियर सेक्शन इंजिनियर सुजित पगारे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुरू असलेले रेल्वेचे काम तात्काळ थांबवण्याचे या बैठकीत ठरले, त्याचबरोबर भूमी अभिलेख यांच्याकडे रेल्वेने सर्व दौंड तालुक्यातील बाधित सर्वे नंबर, गट नंबर, यांची मोजणी करून रेल्वेची जागा निश्चित करावी आणि त्यानंतरच पुढील काम सुरू करावे असे या बैठकीत ठरले. या परिसरामधील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये रेल्वे विभागाकडून कडून सध्याचे अतिक्रमण करण्यात आले आहे. ते देखील अनअधिकृत असल्याचे शेतकऱ्यांनी अर्जामध्ये स्पष्ट नमूद केले आहे संबंधित महसूल विभाग व भूमी अभिलेखच्या माध्यमातून मोजणी करून शेतकऱ्यांवर अन्याय होऊन देऊ नये असे या भागातील सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रसंगी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, अनेक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. “रेल्वे विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व तसेच त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला योग्य देऊन सहकार्य करण्याची गरज आहे. या संदर्भात दौंड तालुका व पुणे जिल्हा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.” – सुशांत दरेकर, माजी उपसभापती, दौंड पंचायत समिती.