गडकरी यांचा पाकिस्तानला सज्जड इशारा
अमृतसर – पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. अन्यथा, भारत आपल्या भूमीतून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखेल, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी पाकिस्तानला दिला. पंजाबमधील एका सभेत बोलताना गडकरी यांनी पाकिस्तानला रोखठोक शब्दांत सुनावले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 साली पाणीवाटप करार झाला. दोन्ही देशांमधील शांततापूर्ण संबंध हा त्या कराराचा आधार आहे. मात्र, पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत; तर कठोर निर्णय घेण्यास भारताला खूप वेळ लागणार नाही, असे त्यांनी म्हटले. भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आधीपासूनच कृती आराखडा बनवण्याचे काम सुरू केले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मोदी सरकारने अनेक विकासकामे केली. मागील पन्नास वर्षांत झाले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले, असा दावाही गडकरी यांनी केला. पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. त्यामुळे गडकरी यांनी सभेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानला इशारा दिला.