Stock Market: अमेरिका – इराण युद्ध सुरू झाल्यापासून शेअर बाजारात झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांचे या कालावधीत तब्बल 23.44 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धाचा भारताला प्रचंड फटका बसला आहे. इतर अनेक क्षेत्रातही उत्पादकता कमी झाल्यामुळे नुकसान होणार आहे. असाच प्रकार दक्षिण आशियातील अनेक देशाच्या बाबतीतही होत आहे. त्यामुळे अमेरिके विरोधात असंतोष पसरू लागला आहे. सध्याच्या घडामोडीमुळे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नावर दोन टक्के नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे समजले जात आहे. 27 फेब्रुवारीपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 5,252 अंकांनी म्हणजे 6.46 टक्क्यांनी कोसळला आहे. यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य या कालावधीत 23.44 लाख कोटी रुपयांनी कोसळून 440 लाख कोटी रुपये म्हणजे 4.77 लाख कोटी डॉलरवर आले आहे. एकेकाळी हे बाजार मूल्य 500 लाख कोटी रुपयांच्या पुढे म्हणजे पाच लाख कोटी डॉलरच्या पुढे गेले होते. अमेरिकेच्या युद्धाची भारतीय गुंतवणूकदारांना किंमत मोजावी लागत आहे. भारत आपल्या गरजेच्या 85% खनिज तेल आणि निम्मा नैसर्गिक वायू आयात करतो. या दोन्ही बाबीवर युद्धामुळे परिणाम झाला असल्यामुळे भारताला या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. त्यामुळे हे युद्ध लवकर संपण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. हेही वाचा – महागाई वाढण्यास झाली सुरुवात; फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 3.21 टक्क्यांवर रुपयाच्या मूल्यावर वाढला दबाव – शेअर बाजारात होत असलेली विक्री, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि खनिज तेलाचे वाढलेले दर या कारणामुळे रुपयाचे मूल्य गुरुवारी 16 पैशांनी कोसळून 92.17 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. युद्ध जर लवकर समाप्त झाले नाही तर रुपयाच्या मूल्यावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता चलन बाजारातील व्यापार्यांनी व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत रुपयाला आधार देणार्या कसल्याही घटना घडत नाहीत. खनिज तेलाच्या आयातीसाठी डॉलरची मागणी वाढली आहे. इतर क्षेत्राकडूनही डॉलरची मागणी मागणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रुपयाचा दर कमी होत आहे. जगातील मुख्य सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा हॉलर इंडेक्स गुरुवारी 0.15 टक्क्यांनी वाढून 99.38 या अंकावर गेला आहे. हा निर्देशांक युद्ध सुरू होण्यापूर्वी 96 अंकावर होता. त्याचा अर्थ रुपयाबरोबरच जगातील इतर देशातील चलनाचे मूल्य सध्याच्या परिस्थितीत वेगाने कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र रिझर्व बँकेकडे 725 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी असल्यामुळे भारताला या आघाडीवर फार चिंता करण्याची गरज नाही.