मुंबई – देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मानाच्या रणजी करंडक स्पर्धेलाही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फटका बसला असून यंदा ही स्पर्धा होणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली अजूनही रणजी करंडक स्पर्धा घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा घेणे अशक्यच असल्याचे मत अनेक सदस्यंनी व्यक्त केल्यामुळे आता येत्या रविवारी हौत असलेल्या बैठकीतच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
रणजी करंडक स्पर्धेसंदर्भात बीसीसीआयने व्यावहारिक निर्णय घेतला आहे. चार दिवस चालणारे रणजी करंडकाचे सामने हे बायोबबल सुरक्षेत होऊ शकत नसल्याचे समोर आल्याने या स्पर्धेबाबत अनिश्चितता कायम राहिली आहे. एकूण 38 संघांना अशा प्रकारची सुविधा पुरवणे अशक्य आहे, असे मत बीसीसीआयच्या काही सदस्यांनी मांडले होते.
रणजी स्पर्धेच्या कालावधीचा विचार करताना बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट चालू राहण्यास विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेला पसंती दिली आहे. सध्या सुरू असलेली मुश्ताक अली टी -20 स्पर्धा संपल्यानंतर या स्पर्धेची घोषणा केली जाण्याची शक्यता शकते.
रणजी स्पर्धा होणार नसली, तरी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना त्याची भरपाई समान पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीत महिलांसाठी देखील आणकी एक टी-20 स्पर्धा घेण्याचा बीसीसीआय विचार करण्याची शक्यता आहे.