सुनीता शिंदे
कराड – येथील प्रीतिसंगमावरील वाळवंटात तसेच तालुक्यातील नदीकाठावरील वाळू चोरण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सर्व विभागाचे शासकीय अधिकारी पूर परिस्थितीचे पंचनामे करण्यात व्यस्त आहेत. याचा फायदा घेत रात्रीच्या वेळेस वाळूची लूट करून स्वत:चे खिसे भरण्याचे प्रकार वाढल्याचे वृत्त दै. प्रभात ने रविवार, दि. 18 च्या अंकात प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेत महसूल विभागाने कराड येथील कृष्णा नदीकाठावर जाण्याच्या मार्गावर भलीमोठी चर काढली आहे. जेणेकरून वाळूची ने-आण करण्यासाठी कोणतेही वाहन आतमध्ये जाऊ शकणार नाही. त्यामुळे वाळू चोरांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. कराड शहरासह तालुक्यातील पूर परिस्थिती ओसरून काहीच दिवस झाले. महापुरामुळे कृष्णा काठावर विशेषतः संगमेश्वर मंदिर ते नदीपात्रापर्यंत मोठ्या प्रमाणात वाळू साठली आहे.
नदीकाठावर विस्तीर्ण असा वाळूचा परिसर पाहून वाळू माफियांच्या तोंडाला पाणी सुटू लागले. सर्व अधिकारी गेल्या काही दिवसांपासून नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यस्त असल्याचे पाहून वाळू माफियांनी नदीकाठावरील वाळू चोरण्याचे प्रकार सुरू केले. कराडातील प्रीतिसंगमावर दररोज रात्री ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने वाळू चोरी होत असल्याचे दिसून आले. या गाड्यांच्या चाकांचे व्रणही प्रीतिसंगमावर स्पष्ट दिसत होते. याबाबत तेथील काही स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाकडे तक्रार केली. मात्र पूर परिस्थितीमुळे तालुक्यात इतके नुकसान आहे की त्यांना वाळू चोरीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. याचा फायदा वाळूमाफिया उचलू लागले आहेत. एकीकडे पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर दुसरीकडे आपली तिजोरी भरण्याचे काम सुरू आहे.
या वाळू चोरीमुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. निसर्गाच्या विरोधात केलेल्या कृत्याचे पूर, दुष्काळ अशा आपत्तीद्वारे परतफेड होत आहे. मात्र मानवाला अजूनही जाग येत नाही. गेल्या काही वर्षांपासून कृष्णामाई घाट परिसरात नदीपात्रातून रस्ता तयार करण्यासाठी काही बुरुज व पायऱ्या कायमस्वरूपी मुजवलेल्या आहेत. त्यामुळे नदीपात्र एकसारखे झाले आहे. मात्र वाळू चोरांमुळे पुन्हा हा भाग उघडा पडण्याची शक्यता आहे.
कृष्णा घाटावर होत असलेली वाळूचोरीचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र काहीच उपयोग झाला नाही. दै. प्रभातने याबाबत आवाज उठवला. प्रीतिसंगम परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने. रविवार, दि. 18 रोजी कृष्णा नदीपात्राकडे जाणाऱ्या मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने मोठी चर खोदण्यात आली. त्यामुळे वाळूचोरांचे कोणतेही वाहन आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही. वाळूचोरांवर अशाप्रकारे पायबंद घालण्यात आल्याबद्दल स्थानिकांनी दै. प्रभातचे आभार मानले.