नवी दिल्ली : दिल्लीतील पराभवाच्या चर्वित चर्वणात वेळ न दवडता भारतीय जनता पक्षाने बिहारच्या रणांगणाची दूंदूभी वाजवली आहे. त्याचवेळी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांचे माजी सहकारी नितिशकुमार आणि भारतीय जनता पक्षावर टिकेची झोड उठवली. नितीशकुमार यांच्या गांधी तत्वज्ञानावरील कथित श्रध्देबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. किशोर यांनी आखलेल्या रणनितीच्या आधारे भाजपाने केंद्रातील सत्तेचा सोपान चढला होता.
गांधीजी, जयप्रकाश नारायण आणि लोहिया यांची शिकवण आणि मुल्ये मी सोडू शकत नाही असे नितीशकुमार मला प्रत्येक भेटीत सांगत असत. गोडसेची पूजा करणाऱ्या पक्षाशी युती करूनही ते असे कसे म्हणू शकतात हे मला जाणून घ्यायचे आहे, असे नितीशकुमार यांनी पाटण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, मतदानाची पध्दत बिहार ही दिल्लीपेक्षा वेगळी रणभूमी असल्याचे दर्शवत आहे. जर महागठबंधनचे निर्माते लालूप्रसाद यादव यांना वर्षाअखेर जामीन मिळाला तर निवडणुकीचे चित्र बदलू शकते.
भाजपाचीही तयारी
दिल्लीतील पराभवाच्या कारणांचा काथ्याकूट करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने बिहारच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बुधवारी इंडिया गेट जवळ हुनार हाट येथे त्यांनी लिट्टी चोखाचा स्वाद घेतला. त्याची प्रचंड तारीफ केली. त्यांची ही कृती त्यांचे लक्ष बिहारच्या निवडणुकीकडे असल्याचे स्पष्ट करणारी आहे. हा अंदाज अर्थहीन नाही. कारण बिहारच्या नागरिकांनी 2015च्या निवडणुकीत दिलेला जनादेश खंडित होता. देशात त्यावेळी मोदी लाट असतानाही राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. त्यापाठोपाठ जनता दल संयुक्त, भाजपा आणि कॉंगेस असे विजयानुक्रम होते.
नितीशकुमार महागठबंधनचे मुख्यमंत्री बनले. त्यांन 2015मध्ये राजदचा हात सोडून भाजपाशी घरोबा करत आपले मुख्यमंत्रीपद कायम ठेवले. त्यामुळे आता या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.