पुणे (प्रभात वृत्तसेवा) – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशाची प्रक्रिया करोनामुळे तीन महिन्यांपासून स्थगित आहे. पण, शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या हालचाली असल्याने “आरटीई’ प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. याबाबत मनविसे, आप पालक युनियनने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस यंदाही उशीर झाला होता. त्यातच राखीव जागांसाठी प्रवेश सोडत काढल्यावर करोनामुळे कागदपत्रे पडताळणी झाली नाही. आता सर्व खाजगी शाळांची खुली प्रवेश प्रक्रिया संपली असून, राज्य बोर्डाच्या शाळांचे प्रवेशही संपत आले आहेत. त्यामुळे “आरटीई’ प्रवेश सोडतीत ज्यांना प्रवेश मिळाले आहेत, त्यांच्यात अस्वस्थता आहे. तर, आर्थिक अडचण असताना प्रवेश कुठे घ्यावा, या विषयी पालक संभ्रमात आहेत.
त्यामुळे सोडतीत प्रवेश मिळालेल्या पाल्यांच्या कागदपत्रांची शिक्षण विभागाने तातडीने पडताळणी करून प्रवेश करून द्यावेत, अशी मागणी आप पालक युनियनचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली आहे. शाळेने तातडीने ऑनलाइन अभ्यास सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी आयपॅड उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, असे किर्दत यांनी म्हटले आहे.
“मनविसे’ही मैदानात
“आरटीई’ प्रवेशाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे, असे मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांना दिले आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे “आरटीई’ प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. आता मात्र ही प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. योग्य ती खबरदारी बाळवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. (दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण)
आरटीई प्रवेशाची राज्यातील स्थिती
9,331 – शाळा
1,15,454 -प्रवेशाच्या जागा
2,91,665 -ऑनलाइन अर्ज दाखल
17 मार्च – ऑनलाइन राज्यस्तरीय लॉटरी काढली
1,00920 – प्रवेशाची लॉटरी लागलेले विद्यार्थी
75,465 – प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी