भोर : शेतकऱ्यांना शून्य मशागत शेतीचे तंत्रज्ञान म्हणजेच एस.आर.टी. पद्धतीने शेती कशी करावी याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याचा उपक्रम भोर तालुक्यातील संगमनेर गावात सुरू झाला आहे. हा उपक्रम वर्षभर दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी सुरू राहणार असून या शेती शाळेचे मुख्य प्रशिक्षक संगमनेर गावचे सुपुत्र किरण यादव हे आहेत. संगमनेर येथील जय मल्हार कृषी पर्यटन येथे सगुना रुरल फाउंडेशन मार्फत एस.आर.टी. म्हणजेच सगुना रिक्रेटिव्ह तंत्रज्ञान अर्थात शून्य मशागत शेती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शिकविण्यासाठी महाराष्ट्रभर एक महत्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभिनव शेतीशाळा उपक्रमाचा प्रारंभ रविवारी (ता. १९) करण्यात आला. शेती शाळेच्या पहिल्या सत्रामध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे २० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये दीड तास सैद्धांतिक प्रशिक्षण व दीड तास प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. शेती शाळेत उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले. मुख्य प्रशिक्षक म्हणून शेतकरी किरण यादव, तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून शेतकरी रमेश धाडवे आणि उज्वला विजय बांदल यांनी काम पाहिले. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये शेती शाळा एकाच वेळी सुरू करण्यात आल्या असून, पुणे, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, जालना, लातूर, रायगड, जळगाव, अमरावती, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठीची शेतीशाळा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सुरू करण्यात आली असून, येथे एस. आर.टी. चे समर्थक शेतकरी किरण यादव यांच्या शेतावर प्रशिक्षण दिले जात आहे. एस.आर.टी. शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो, नांगरणी फक्त एकदाच करावी लागते. एकदा नांगरणी केल्यानंतर पुढील दहा वर्ष नांगरणी करण्याची गरज नसते. या पद्धतीने शेती केल्यास श्रमाची बचत होते. तसेच उत्पादन खर्चही अत्यंत कमी येतो. जमिनीचा पोत सुधारतो तसेच गांडुळ निर्मितीला चालना मिळते. परिणामी शेतीतून वाढीव उत्पादन निघते आणि शेतीचा दर्जा वाढून शेतकऱ्याला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. या शेती पद्धतीची निर्मिती कृषिरत्न शेखर भडसावळे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी सगुना बाग, कर्जत नेरळ येथे केली. त्यांच्या या अनुभवाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मिळावा म्हणून त्यांनी या शेती शाळांचे नियोजन केले आहे.