– डॉ. सुनीलकुमार सरनाईक
वारी निघाली… वारकऱ्यांची पावले पंढरीच्या मार्गाने चालली आहेत. या वारीत महिलांचेही पाय चालताना दिसतात. स्त्रियांनी मंदिरात जाण्याची बंधने झुगारून टाकणारा भागवत धर्म म्हणूनच श्रेष्ठ ठरतो. ज्ञानदेवानेच हा पाया रचला आहे.
13 व्या शतकात कर्मकांडे, अघोरी उपासना यांचे खूपच अवडंबर माजवले जात होते. तत्कालीन धार्मिक व सामाजिक परिस्थितीसुद्धा गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी होती. सर्वसामान्य जनतेवर धार्मिक व सामाजिक बंधने घालून अन्याय व अत्याचार करण्यात येत होता; अर्थात तत्कालीन परिस्थितीत उत्साहवर्धक असे वातावरण बिलकुल नव्हते. व्रतवैकल्ये, जपजाप्य, यज्ञयाग, स्पृश्य-अस्पृश्य अशा धर्मविषयक कल्पनांचा सुळसुळाट झाला होता. धर्माविषयीच्या कल्पना अंध:श्रद्धेमुळे संकुचित बनल्या होत्या. धर्माचा मूळ अर्थ लक्षात न घेता कर्मठपणा, यज्ञयाग, जपजाप्य, तीर्थाटन म्हणजेच धर्म असा गैरअर्थ लागू करण्यात आला होता. त्यामुळे ठराविक वर्गात कष्ट न करता धर्माच्या नावाखाली ऐतगब्बूपणा तर वाढला होताच, शिवाय उन्मत्त व उद्दामपणे इतरांचे शोषणही करण्यात येत होते.
त्यांच्यामध्ये सुखासीनता व भोगलालसा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली होती. तत्कालीन सामाजिक व धार्मिक परिस्थितीत “चतुवर्ग चिंतामणी’ सारख्या ग्रंथाची निर्मिती करून धर्माच्या नावावर कर्मकांडे केली जात होती. अशा कर्मकांडाला खतपाणी घालणारा ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ असे पटवून दिले जात होते. ठराविक चाकोरीतून निर्मिती झालेल्या जुन्या ग्रंथांची पारायणे करून पढिकपंडित मंडळी आपला जबरदस्त पगडा कायम ठेवण्यात यशस्वी झालेली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अत्यंत कडक व रोखठोक भाषेत तत्कालीन सामाजिक व धार्मिक स्थितीचे वर्णन आपल्या अभंगात केले आहे, ते म्हणतात-
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने। विषय लोभी मनें । साधनें बुडविली ।।
कर्मकांडाच्या मागे लागून धर्माचा अनर्थ पसरविणाऱ्या कर्मठांचे स्पष्ट व रोखठोक चित्रण ज्ञानोबारायांनी आपल्या “ज्ञानेश्वरी’ तथा “भावार्थ दीपिका’ या ग्रंथात रेखाटले आहे. सर्वसामान्य खालचा वर्ग तर अंधश्रद्धा आणि अज्ञानी भोळ्या समजुतीच्या साखळदंडात जखडला गेला होताच. यात्रा, जत्रा, खेत्रांचे प्राबल्य वाढले होते. गंडेदोरे, ताईत हेच आपल्या रक्षणासाठी आयुधे आहेत अशी खालच्या वर्गाची धारणा झाली होती. अशा वेड्या समजुतीने नको त्या मार्गावर जाणाऱ्या अज्ञांनी भक्तांचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात केलेले आहे.
वेदु संपन्न होए ठायीं । परि कृपण ऐसा आन नाही । जो कानीं लागला तिहीं । वर्णाचाचि ।।
यावरून ज्ञान संपादनाची दारे कशाप्रकारे सामान्य माणसांसाठी बंद होती, हे प्रकर्षाने दिसून येते. शिवाय संस्कृतसारख्या अवघड व क्लिष्ट भाषेची अडचण तर भासत होतीच. अर्थात, सामान्यजण अज्ञान अंध:कारात पूर्णपणे चाचपडत होते, त्यांना ज्ञानाचा मार्ग दाखविणारे कोणी नव्हते.
या चातुर्वर्ण्य संस्थेविरुद्ध बंड करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात अनेक वेळा झाल्याचे दिसून येते. बाराव्या शतकाच्या कितीतरी पूर्वी महानुभाव पंथाने देखील वैदिक धर्माविरुद्ध विशेषतः चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले असल्याचे दिसून येते. एकांतिक संन्यासवाद, त्यातील चमत्कृती, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांचे लौकिक जीवन, त्यांचे पांडित्य, त्यांची सर्वसामान्य जनतेच्या बुद्धीपलीकडे व आकलनाच्या पलीकडे जाणारी विद्वताप्रचूर तात्त्विक ग्रंथरचना या आणि इतर कारणांमुळे महानुभाव पंथ यशस्वी झाल्याचे दिसून येते. भागवत संप्रदायाला स्त्री-शूद्रांच्यावरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांच्या आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा करून देण्याची अत्यंत अवघड व कठीण कामगिरी पार पाडायची होती.
भागवत संप्रदायाच्या झेंड्याखाली स्त्री-शूद्रांना तसेच सकल मानवजातीला आत्मोन्नतीचा मार्ग दाखविण्याच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली ती श्री संत ज्ञानदेव यांनी. अर्थात, अशा विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानदेवांचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे नजरेत भरते. एका परीने सामाजिक आणि त्या अनुषंगाने मानसिक परिस्थितीच माणसाचा पिंड बनवित असते. ज्ञानेश्वरांच्या बाबतीतसुद्धा नेमके हेच घडलेले दिसून येते. वर्णाश्रम व्यवस्थेची पोलादी श्रृंखला, जातीसंस्थेचा चिवटपणा, पढिकपांडित्याची बौद्धिक मिरासदारी, स्त्री-शूद्रादी वर्गाची झालेली सामाजिक अवहेलना आणि मानसिक कोंडमारा, या साऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिगत जीवनात घेतला होता.
संत ज्ञानेश्वरांचा जन्म सन 1275 चा. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या आपेगाव येथे झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे आपेगावचे कुलकर्णी. आई रुक्मिणीबाई पतीपरायण होत्या. हे दोघेही उच्च कोटीचे साधक तथा मुमुक्षु होते. पांडुरंग हे त्यांचे उपास्य दैवत होते. भक्तीच्या व साधनेच्या शिखरावर असतानाच त्यांनी संन्यास घेण्याचे ठरविले आणि संन्यास घेतला. पण पुन्हा ते संसारात राहू लागले. त्यांना निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली.
संन्यासानंतर पुन्हा संसार करणे म्हणजे घोर पापाचरणच! आपेगावच्या पंचक्रोशीतील ब्रह्मवृंदानी मोठा गहजब माजविला. या घोर पापाबद्दल अंतिमतः ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना धर्मशास्त्राप्रमाणे देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ही इवलीशी चार बाळे आईवडिलांविना पोरकी झाली. धरणीने दुभंगून गिळून घ्यावे वा आभाळ कोसळून पडावे असे हे जणू महाकाय, महाराक्षसी, महाप्रलयकारी संकट या चारी बालकांवर कोसळले.
हे काय कमी होते म्हणून मौजीबंधनाचा अधिकारही ज्ञानदेवांदी भावंडांना नाकारण्यात आला. संन्याशाची पोरं म्हणून अबालवृद्ध त्यांना हिणवू लागला. जो तो त्यांची हेटाळणी करू लागला. अत्यंत खालच्या पातळीवरची निंदानालस्ती व अवहेलना सहन करावी लागली. हे सारे कटू प्रसंग अनुभवल्यानंतर बहुजन समाज किती कठीण परिस्थितीत जीवन जगत असेल हे ज्ञानदेवांना उमजले; त्यांची व्यथा त्यांच्या लक्षात आली; बहुजन समाजातील सामाजिक दैन्य आणि दुःख किती दाहक आहे याची त्यांना प्रचिती आली. त्यामुळे त्यांना बहुजन समाजाविषयी मनस्वी सहानुभूती वाटू लागली.
नाथपरंपरेची शिकवण ज्ञानदेवांच्या घराण्यांत मुळातच होती आणि पंढरपूरचा विठ्ठल हे त्यांचे उपास्य दैवत होते. नाथ संप्रदायाचा अद्वयानंद आणि पंढरीची प्रेमभक्ती यांचा मनोज्ञ मिलाफ ज्ञानदेवांनी घडवून आणला आणि याच भरभक्कम पायावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची पायाभरणी केली. हे निर्विवाद सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. म्हणून तर संत बहिणाबाई म्हणतात-
संतकृपा झाली । इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले आवार। जनार्दन, एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश। बहिणी फडकति ध्वजा । निरोपण केले ओजा।।