– डॉ. राजू पाटोदकर
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे वेध सर्वांनाच लागले आहे. हा एक राष्ट्रीय सण आणि आनंदोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दिल्ली येथील जवानांचे पथसंचलन. त्याबाबत…
जगातील सर्वात मोठी लिखित घटना स्वीकारून 26 जानेवारी 1950 पासून आपले प्रजासत्ताक राष्ट्र झाले. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर (राजपथ) दरवर्षी संचलन केले जाते. भारतीय लष्कराची ताकद, जवानांची हिंमत आणि भारताच्या एकात्मकतेचे यथार्थ दर्शन संपूर्ण जगाला या निमित्ताने घडविले जाते. हे संचलन पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. तसेच आपल्या देशातर्फे एखाद्या परदेशी पाहुण्यासही विशेष निमंत्रण देऊन आमंत्रित केले जाते आणि त्यांच्यासमोर दिमाखाने आणि भव्य दिव्य संचलन केले जाते. या वर्षी प्रधानमंत्री महोदयांच्या विशेष निमंत्रणाने फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे विशेष अतिथी आहेत. तर या संचलनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या वर्षी संचलनात केवळ महिला शक्तीच सहभागी होणार आहेत.
सुरुवातीच्या काळात इर्विन स्टेडियम म्हणजे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान येथे या कवायती होत असत. त्यानंतर राजपथावर संचलन सुरू झाले. 1955 पासून या प्रजासत्ताक दिवस परेडला सुरुवात झाली. भारतीय लष्कराचे आर्मी, नेव्ही व वायुदल यांच्या विविध रेजिमेंट्सचे जवान, पोलीस दल, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाइडचे विद्यार्थी तसेच सुमधुर असे विविध बॅन्ड पथक यांचे पथक संचलन करतात. तसेच राष्ट्रपतींचे घोडस्वार सुरक्षा पथक, उंटस्वाराचे पथक देखील यात असते. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट अमर जवान ज्योतीपर्यंत असलेल्या या राजपथाच्या दोन्ही बाजूने प्रेक्षकांसाठी जागा असते.
विविध राज्यातील संस्कृतीचे वैशिष्ट्य दर्शविणारे चित्ररथ समग्र भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितात. तसेच निर्भय मिसाइल, अश्विन रडार सिस्टिम देखील या संचलनात असतात. वायुदलाच्या आकर्षक व चित्तथरारक कवायती होतात. मोटार सायकल स्वार जवान कसरती करतात. 21 तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत सादर केले जाते. सेनादलाची सर्वोच्च पदक देऊन वीरांचा, शहिदांच्या कुटुंबाचा सन्मानाही केला जातो. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होते. एकूणच संपूर्ण वातावरण शीतलहरीपेक्षा देशभक्तीच्या धुक्याने आच्छादलेले असते.
संचलन सुरू झाल्यावर अत्यंत स्फूर्तिदायी असे वातावरण असते. अत्यंत शिस्तीत एक एक पथक पुढे येते आणि मुख्य मंचकासमोर आपल्या राष्ट्रपतींना तथा सेना दलाच्या सर्वोच्च कमांडरला व अतिथींना सलामी देत पुढे जाते. आपला तिरंगा राष्ट्रध्वज आपल्या दोन्ही बाजूस डौलाने फडकत असतो. अगदी आसमंत देखील या ध्वजलहरीने स्तंभित होतो. नजरेच्या टप्प्यात जिकडे तिकडे तिरंगा, हजारो तिरंगा ध्वज हे दृश्य पाहून आपले नेत्र सुखाने दिपून जातात आणि आपण या तिरंग्या राष्ट्रध्वजास सलामी देतो. सळसळणारा तिरंगा ध्वज, देशभक्तीपर गीते असे मंत्रमुग्ध वातावरण असते. श्वासाश्वासातून उसळणारा राष्ट्रप्रेमाचा ध्यास त्यावेळी आपल्या हृदयाची स्पंदने होतात आणि मन तिरंग्या सोबतच लहरते, हिंदोळा घेते. ही राष्ट्रभक्तीची अतिउच्चतम अनुभूती प्रजासत्ताकदिन परेडच्या वेळी संचलन करणार्या प्रत्येकाची अन् ती पाहणार्या करोडो भारतीयांची होते.
संरक्षण दलात सेवा करताना ही संधी मिळू शकते. पण विद्यार्थी असताना ही संधी मिळणे हे भाग्यच असते. आपला देश आपल्यासाठी काय करतो? असा प्रश्न विचारण्यापेक्षा, आपण देशासाठी काय करू शकतो? असा प्रश्न युवा वर्गाला विचारला पाहिजे आणि त्याचे उत्तर संरक्षण दलातील या युवा वर्गाकडे पाहिले की मिळते. निश्चितच अभिमान आणि राष्ट्रभक्ती याचे मूर्तिमंत प्रतीक असलेले हे प्रजासत्ताक दिन संचलन आहे. जवळपास 25 दिवस या संचलनाची तयारी करून घेतली जाते. विविध दलांचे कॅम्प सुरू होतात. या परेडसाठी ज्यांची निवड होते ते खरोखरच भाग्यवान असतात, कारण कठोर परिश्रमाने विविध कसोट्या पार करत या जागी पोहोचलेले असतात.
यातील प्रत्येकाच्या मनात, आयुष्यात एकदा तरी प्रजासत्ताक दिन परेडची संधी मिळावी हीच भावना असते किंबहुना त्याचे ते स्वप्नही असते आणि या स्वप्नपूर्तीसाठी कित्येक दिवस, वर्ष मेहनत घेतात आणि त्यांच्या या स्वप्नपूर्तीचा हा क्षण येतो. मी याचा प्रत्यक्ष अनुभव 1991 या वर्षी घेतला असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिन संचलन म्हणजे राष्ट्रभक्ती, शक्तीची उच्चतम अनुभूती आहे.
राष्ट्रीय एकात्मता
26 जानेवारी 1991 च्या प्रजासत्ताक परेडमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या म्हणजे एन.एस.एस.च्या पथकामार्फत महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी होतो. राज्याच्या विविध विद्यापीठांमधून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशी निवड त्यावेळी केली होती. देशातील विविध विद्यापीठाचे एन.एस.एस.चे प्रतिनिधी या कॅम्पमध्ये होते. आमच्या निवास तंबूमध्ये एकाच राज्याचे विद्यार्थी न ठेवता सरमिसळ करून बारा-बारा विद्यार्थ्यांच्या समुहाला एकत्र ठेवले होते आणि यातूनच राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक भक्कम झाली.
तो तंबू म्हणजे एक घर आणि त्यातील आम्ही विद्यार्थी म्हणजे एक कुटुंब असाच संदेश सर्वच कॅम्पमधून दिला जातो. आपल्या राज्यातही प्रजासत्ताक दिन परेड होते. मुंबईत शिवाजी पार्क, दादर येथे याचे आयोजन केले जाते. अगदी दिल्लीच्या संचलनाच्या धर्तीवर येथील आयोजन असते. राज्यपाल महोदयांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होऊन संचलन सुरू होते. या संचलनात देखील संरक्षण दल, पोलीस, होमगार्ड, विद्यार्थी यांच्यासह विविध विभागांची पथक आणि चित्ररथ सामील असतात. ही राष्ट्रप्रेमाची अनुभूती घेऊया.