विठ्ठल वळसेपाटील
आजची शेती व शेतकरी यांची अवस्था पाहता महात्मा फुले यांच्या शेतीविषयीच्या ध्येयधोरणांचा अवलंब करणे काळाची गरज ठरणार आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेती व पशुधनाला महत्त्वाचे स्थान आहे. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना पूर्वीपासून सावकार, भांडवलदार, व्यापारी हे लुटत आले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे अज्ञान हेच सावकार, व्यापारी वर्गाचे बलस्थान असल्याचे म्हटले आहे. त्यांनी “शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ब्रिटिश सरकारपुढे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्यामुळे काही मागण्या मान्य कराव्या लागल्या.
शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मागासवर्ग, महिला, शोषित, बहुजनांचे दुबळेपण कशात आहे तर ते शिक्षणाचा अभाव, अज्ञान व अंधश्रद्धा यात आहे, असे मत महात्मा फुले यांनी मांडले. त्यांचे विचार केवळ बोलके नव्हते, तर अंगावर आसूड ओढणारे होते. ते फटके शोषितांना जागे करणारे तर शोषण करणाऱ्या सावकार व ब्रिटिश सरकारला जागवणारे होते. त्यांचे विचार केवळ वाचनीय नसून व्यवस्थेवर कोरडे ओढणारे आहेत. शोषितांच्या दास्यपणाची मीमांसा करणारे क्रांतिकारी विचार आहेत.
वर्षानुवर्षे शोषित वर्गाला राजव्यवस्थेने गुलाम बनवून ठेवले होते. या गुलामांना जागे करण्याचे कार्य त्यांनी केले. ब्रिटिश काळात भारताचे संपूर्ण जीवनमान शेतीवर आधारित होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्यांवर फुले यांनी भडीमार केला. शेती हाच एक पर्याय होता. जोडधंद्याचे ज्ञान नव्हते. दुष्काळ परिस्थितीत सिंचनाची साधने जुनी होती.
मोट सारख्या साधनाने शेती मोठ्या प्रमाणात होत नसे. बैल व शेती अवजारे खरेदी करण्याचा प्रसंग आला की त्यांना अनेक प्रकारे पिळवणुकीचा सामना करावा लागत असे. घरात करता पुरुष जावो किंवा मोठे कार्य केल्याने पैसा संपला असला तरी शेतसारा न चुकता भरावा लागत असे. शेतीवर कर्ज घेतलेले असे. परतफेड व्याजासह न झाल्यास जप्ती. यातून कुटुंबाचे हाल होत असत. शेतबांधावरून भांडणे असले तरी सरकारी कचेरीकडूनही शेतकरी लुटला जात असे. वर्षानुवर्षे शेतकरी शिक्षणाअभावी व अंधश्रद्धेपोटी गुलाम राहिला. याबाबत परखड चिकित्सा फुले यांनी मांडली आहे.
ब्रिटिश सरकार अनेक ठिकाणी जकात लावून अनेक प्रकारचे कर आकारत असे. जंगलातील लाकूडफाटा आणि गवतावर शेतकऱ्यांचे पोट चालत असे अशी जंगले ब्रिटिशांनी ताब्यात घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. ब्रिटिश सरकारला मुबलक पैसे मिळावेत यासाठी कालव्याच्या पाण्यावर मोठा कर वसूल केला जात असे. महात्मा फुले यांनी कालव्याचे पाणी व कराच्या नियोजनाबाबत सरकारला सांगितले. शहरात भाजीपाला विक्रीस आणताना जकाती आडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असे.
त्यामुळे घरी जाताना मुलाबाळांसाठी काही शिल्लक राहात नसे. शिवाय येथील कच्चा माल युरोपला नेऊन पक्का माल जादा किमतीने पुन्हा भारतात विकला जात असे. त्यामुळे येथील शेतकरी आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा शेतसारा कमी करून शेतकऱ्यास शेतीसंबंधीचे ज्ञान दिले पाहिजे, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले होते.
1875 मध्ये पुणे व नगर जिल्ह्यांत सावकारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध त्यांनी दोन वर्षे आंदोलन चालवले.
शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धचे आंदोलन खतफोडीचे बंड म्हणून ओळखले जाते. “नांगर चालणार नाही आणि जमीन विकणार नाही’ ही भूमिका या आंदोलनात होती. पुढे 1877 मध्ये फुले यांनी दुष्काळाबाबत ब्रिटिश सरकारला पत्रक पाठविले. या वेळी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनाही आश्रय दिला. 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या मुलाच्या कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले होते. तेव्हा महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक वेशात उपस्थित राहून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडली.
सावकारी फसवणूक व शेतकऱ्यांचे दारिद्य्र यावर फुले यांचे म्हणणे मान्य करून, ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळवून देणारा कायदा केला. शेती हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक असल्याचे ओळखणारे महात्मा फुले हे युगपुरुष होत.
महात्मा फुले यांनी शेतीच्या विकासाबाबत काही उपाय सुचवले आहेत. पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने व पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून होती, त्यामुळे धान्य उत्पादन कमी होत असे.
परिणामी अन्नधान्य साठा संपल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती व शेतीचे आधुनिकीकरण करावे, वृक्षतोड थांबवावी, केवळ पावसावर अवलंबून न राहता आधुनिक उपकरणांचा वापर करावा. तळी, तलाव, धरणे व कालवे बांधावेत. दुष्काळात शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज द्यावे. कालव्याचे पाणी नळावाटे द्यावे, त्यामुळे जास्त पाणी मिळण्यास सोपे होईल.
पूर्वी वीज नसल्याने वन्यप्राणी व जंगली डुकरे यांचा मोठ्या प्रमाणात शेतमालाला उपद्रव होत असे. रात्रीच्या वेळी शेत राखण करावे लागत असे. हे उपद्रव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना गावठी बंदुका द्याव्यात व त्याची परवानगी द्यावी. शेतकऱ्यांच्या शेताच्या नुकसानीबाबत सरकारच्या तिजोरीतून अथवा पोलीस अंमलदाराच्या पगारातून नुकसान भरून देण्याबाबत कायदा करावा, अशी मागणी महात्मा फुले यांनी ब्रिटिश सरकारकडे केली होती. त्यामुळे शेतकरी सुखाची झोप घेईल, असे त्यांचे मत होते.
महात्मा फुले यांनी “सत्यशोधक समाज’मार्फत समाजसुधारणेचे कार्य केले. सामाजिक विषमता, जातीयता, मुलींचे शिक्षण, शेतकरी, कामगार, दीनदलित, महिला, शुद्रातिशूद्र समाज यांच्या उन्नतीसाठी समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांचे विचार क्रांतिकारी, परिवर्तनशील, विज्ञाननिष्ठ व बुद्धिप्रामाण्यवादी होते. 28 नोव्हेंबर 1890 रोजी या क्रांतिसूर्याने आपला देह ठेवला. त्यांच्या पश्चातही त्यांची पत्नी सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले.