पत्रीसरकारमधील मुख्य प्रचार मंत्री, स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम यांचे आज पुण्यस्मरण.
शाहीर शंकरराव निकम यांचा जन्म कृष्णेच्या डाव्या तीरापासून साडेचार किलोमीटर अंतरावर चालुक्यांची राजधानी असलेल्या, कुस्तीगीरांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य कुंडल या गावात 22 ऑगस्ट 1922 रोजी झाला. “सांगतो ऐका हे ज्ञानेश्वरी’ हे सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेतील पुस्तक शंकरराव निकम यांनी लिहिले. खालील त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओळी पाहून त्यांच्या प्रतिभेची नक्कीच कल्पना येईल.
प्रसन्न होऊनि कृष्ण बोलले
ऐक अर्जुन आता
पूर्वजन्मीचे नाते आपुले
म्हणून सांगतो गीता
भक्तामध्ये श्रेष्ठ भक्त तुजवर माझी प्रीती
सत्य सांगतो तुला अर्जुना
युद्धकलेची नीती
रानात पार्था विसर
आपुली सर्वही नातीगोती
कर्तव्याच्या आड ना येती
सत्य अहिंसा शांती
हेच सांगण्या जग जाहलो
तुझा सारथी आता
पूर्वजन्मीचे नाते आपुले
म्हणून सांगतो गीता
22 ऑगस्ट 2022 पर्यंत त्यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. शाहिरांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले होते. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक कवी शाहीर व गायकांच्या जोड्या होऊन गेल्या. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात होनाजी व बाळा कारंजकर ही जोडी गाजली. होनाजींनी काव्य रचावे व बाळा कारंजकर यांनी गावे, त्यामुळे “होनाजी बाळा’ ही जोडी प्रसिद्ध झाली. पत्रीसरकारच्या काळात गदिमा व शाहीर शंकरराव निकम ही जोडी गाजली. शाहीर निकम स्वतः कवने करीत असत. एकदा काही मुले त्यांनी केलेला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरील पोवाडा शेतात म्हणत होती. कवितेचे बोल होते “इंग्रजाची हड्डी जिरवण्याला… क्रांतीचा घोष त्यांनी केला… नाना पाटील त्यात आपला’त्यावेळी नाना पाटील तेथून जात होते व त्यांनी ते ऐकले. डोळ्यांत पाणी आणून ते मुलांना म्हणाले, “पोरानू, आता खरंच सांगतो. तुम्ही ज्या नाना पाटलाचा पवाडा म्हणताय तो मीच आहे. हा पवाडा माझ्या दोस्तानं शाहीर शंकरराव निकमानं रचलाय.’
क्रांतीसिह यांनी त्यावेळी लग्नसमारंभात हुंडा पद्धतीवर टीका करून बिगर हुंडा गांधी विवाह पद्धतीचा प्रसार केला होता. त्यावेळी शाहीर निकम “जानु शेतकरी राहात होता एका गावात मूल बाळ आनंदात डडड’, हा प्रबोधनपर पोवाडा गायचे. हा पोवाडा खूपच लोकप्रिय झाला होता. “नाही मरणाची आम्हा भीती गं, भरली अंगात स्वराज्याची स्फूर्ती गं’ यासारख्या रचना त्यावेळच्या तरुणांच्या ओठी होत्या. शाहीर निकमांचे पोवाडे मराठवाडा, विदर्भ कोकण सर्व महाराष्ट्राच्या भागात लोकप्रिय झाले होते. ते किशोर वयाचे असताना गदिमा हे कुंडल येथे शिक्षणासाठी राहिले होते. त्यावेळी गावातील मुलांना गदिमा देशभक्तांच्या गोष्टी सांगत.
शाहिरांचे लग्नही गनिमीकाव्याने 42 च्या आंदोलनातच पार पडले. त्यांच्या विवाहाची बातमी लागताच संपूर्ण गावाला गिल्बर्ट या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात पोलिसांनी वेढा घातला. त्यांच्या विवाहाला जणू बंदुकीच्या आवाजाचीच आतिषबाजी झाली. पण विवाह उरकून शाहीर निसटले. यशवंतराव आणि गदिमा या दोन्ही माणदेशी माणसांचा स्नेहबंध 1942 च्या आंदोलनकाळात भूमिगत असताना, कुंडल येथील आंदोलकांच्या गुप्त बैठकांमध्ये प्रथमच आला. शाहीर निकम यांनी काही कविता आणि कवने सादर केली. ती ऐकल्यावर शाहिरांकडे विचारणा केली असता गदिमांचे नाव पुढे आले. मग गदिमा व यशवंतराव यांची मैत्री झाली. एकदा 42 च्या आंदोलनात यशवंतराव चव्हाण व शाहीर भूमिगत झाले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते.
योगायोगाने पोलिसांना कुंडल येथे शाहिरांच्या घरात लपून बसलेले यशवंतराव चव्हाण सापडले व शाहीर देवराष्ट्रे येथील यशवंतरावांच्या घरात सापडले. अशा अनेक रोचक घटना आहेत. यशवंतराव हे शाहीर निकम व शाहीर औंधकर ऊर्फ ग. दि. माडगूळकर यांच्या बैठकींचा उल्लेख आवर्जून करीत. 42 च्या वीरश्रीने भारलेल्या काळात गदिमा “शाहीर औंधकर’ म्हणून प्रसिद्ध होते. पुण्याला शनिवारवाड्यावर शाहीर निकमांचा कार्यक्रम सुरू असताना “स्वराज्य दारी आले, आणा दीपक ज्योती’ हे गाणे म्हणण्याची संधी वाईच्या शाहीर साबळे यांना मिळाली आणि तेथूनच साबळे यांचा खरा प्रवास सुरू झाला.
गदिमांनी “मंतरलेले दिवस’ हे शाहिरांच्या जीवनावर पुस्तक लिहिले तसेच ना. सी. फडके यांनी शाहिरांवर “झंजावात’ हे पुस्तक लिहिले. शाहिरांनी पत्रीसरकारमधून सामाजिक व भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात, हैद्राबाद मुक्तीसंग्राम, गोवा मुक्तीसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही भाग घेतला. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली गेली नाही. यशवंतराव चव्हाण यांनी एका कार्यक्रमात ही खंत बोलून दाखविली होती. यशवंतराव चव्हाण यांच्यावर केंद्रात जबाबदारी दिल्याने ते दिल्लीला गेले. एकदा महाराष्ट्रात आल्यावर त्यांची शाहिरांशी गाठ पडली, त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, “शाहीर, काय म्हणतो तुमचा सांगली जिल्हा?’ त्यावर शाहीर म्हणाले, “पद्यात सांगू का गद्यात?’ यशवंतराव म्हणाले, “मग पद्यातच सांगा.’ शीघ्र कवित्व असलेले शाहिरांनी ताबडतोब पद्यात उत्तर दिले. त्यावेळी वारणा धरणाच्या जागेवरून खुसगाव का चांदोली असा वाद सुरू होता.
महाराष्ट्राचे भाग्यविधाते ऐका यशवंत
दादा बापू वाद माजला आहे सांगलीत
अग्रहक्क हा खुजगावाला,
तज्ज्ञांनी तो आहे दिधला
मोठा साठा सोडून करितो दुष्ट मणी हेत
दोघांचीही शुद्ध भावना देशहिताची
सत्य कल्पना
विकल्प नाही मनात त्यांच्या
शुद्ध भाव यात
शाहीर निकम हे गोविंदाग्रजांच्या संपर्कात होते. विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख त्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकात बसत असत. मुंबईच्या कार्यक्रमात प्रबोधनकार ठाकरे, मास्टर विनायक असे दिग्गज त्यांच्या कार्यक्रमास आवर्जून आले होते. एका कार्यक्रमात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्हाळ्यावर सर्व भूमिगत झालेले कार्यकर्ते जमा झाले. त्यावेळी शाहिरांनी सांगितले, “माझे पोवाडे ग. दि. माडगूळकर यांनीच रचले होते.’ एका कार्यक्रमात कविवर्य बा. भ. बोरकर यांनी त्यांना आपल्या हातातील अंगठी भेट दिली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी डफ खाली ठेवायचे ठरविले व किर्लोस्करवाडी येथे शेवटचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमास उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर, यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील उपस्थित होते. त्यावेळी शेवटी शाहीर म्हणाले, “आज मी डफ खाली ठेवायचं ठरवलंय; पण स्वकीय चुकले तर पुन्हा डफ हाती घेईल.’ 5 एप्रिल 1997 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माधव विद्वांस