सातारा (प्रतिनिधी) -सातारा जिल्हा परिषदेने नेहमीच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आणखी आधार देण्याचे काम जिल्हा परिषदेचा कृषी व पशुसंवर्धन विभाग करेल. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद विशेष उपक्रम राबवत असून शेतकऱ्यांना रास्त भावाने कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.
खरीप हंगाम 2020 च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके या कृषी निविष्ठांची विक्री रास्त भावामध्ये होण्यासाठी कृषी विक्री केंद्रधारकांनी आपल्या विक्री केंद्रामध्ये शिल्लक साठा व त्यांचा दर जाहीर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विक्री केंद्राच्या दर्शनी भागात साठा फलक व दर फलक लावून फलक दैनंदिन अद्यावत करणे कायद्याने बंधनकारक आहे. बहुतांश कृषी निविष्ठा विक्री केंद्रधारक फलक अद्यावत ठेवण्यामध्ये दुर्लक्ष करतात. परिणामी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या किंमती व उपलब्ध साठ्याची माहिती मिळत नसल्याने त्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फलकावर आवश्यक माहिती दैनंदिन अद्यावत केली जात आहे काय? याची तपासणीची मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 373 कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी पंचायत समित्यांकडील सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे. तपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या विक्री केंद्रांवर आवश्यक कारवाई करण्यात आल्याचे मंगेश धुमाळ यांनी सांगितले. खरीप 2020 च्या हंगामात जिल्ह्यात 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होईल, असे अपेक्षित धरून 17 हजार 63 क्विंटल गरज गृहीत धरण्यात आली आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने या पिकाचे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. यासाठी मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे बियाणे शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.