डॉ. विजय कुमार
भारतीय प्रजासत्ताकाची आजवरची वाटचाल पाहता गेल्या 60-70 वर्षांत आपण अनेक प्रश्नांची सोडवणूक लोकशाही मार्गाने केलेली आहे. तथापि, आरोग्य, शिक्षण, दारिद्य्र निर्मूलन, कृषी यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकासाची गरज आहे. आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत आधार असलेला तरुणवर्ग लोकशाही भक्कम करण्यासाठी पुढे सरसावेल आणि केवळ भारताचेच नाही तर जगाचे नेतृत्व करू शकेल.
संविधान परिषदेने राज्यघटना मान्य केल्यानंतर आणि ती स्वीकारल्यावर भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रसंगी घटना परिषदेत केलेल्या भाषणात असे म्हटले होते की, आपणास राजकीय लोकशाहीचे सामाजिक व आर्थिक लोकशाहीत रूपांतर करणे आवश्यक आहे, तसे झाले नाही तर लोक एक दिवस लोकशाहीचा चेहरामोहरा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी मांडलेले विचार अत्यंत मूलभूत आणि चिंतनीय आहेत. आपल्या देशापुढे प्राचीन काळापासून अनेक समस्या आहेत. पैकी सर्वांत मोठी समस्या म्हणजे राजकीय ऐक्याची. फंदफितुरीने अनेकवेळा घात केला आणि आपण आपले स्वातंत्र्य गमावले. म्हणूनच आज मिळवलेले स्वातंत्र्य टिकवणे आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. डॉ. आंबेडकर असे म्हणाले होते की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ह्या गोष्टी परस्परावलंबी आहेत. स्वातंत्र्याशिवाय समता नाही, समतेशिवाय सामाजिक न्याय मिळू शकत नाही आणि या सर्वांशिवाय बंधुता नाही. या चारही गोष्टी एकमेकांपासून दूर ठेवता येत नाहीत. त्यांनी असेही म्हटले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही चतुःसूत्री आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे तर गौतम बुद्धांच्या जीवनातून घेतलेली आहे. भारतामध्ये लोकशाहीच्या परंपरा होत्या त्याची बीजे आपण वर्तमानकाळात अधिक प्रभावीपणे जोपासली आहेत. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लोकशाही अखंडितपणे टिकून आहे. आता लोकशाही जीवनाचा मार्ग होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही लोकशाही टिकण्यासाठी आपल्या प्रजासत्ताकाची आजवर वाटचाल ही महत्त्वाची, स्पृहणीय आणि समाधानकारक अशीच आहे.
आज प्रजासत्ताक भारतापुढे सामान्य माणसाचे असह्य जीवन सुसह्य करणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्यानंतर 1960च्या दशकात गरिबीचे प्रमाण झपाट्याने घटले आणि आज केवळ 27 टक्के इतकेच गरिबीचे प्रमाण आहे. काही अभ्यासकांच्या मते हे प्रमाण आता 11 टक्क्यांवर येते आहे. याचा अर्थ असा आहे की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या समोर असणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा या समस्या सोडवल्या आहेत आणि सोडवण्याच्या मार्गावर आहोत. आता आपणापुढे असलेल्या समस्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा सर्वांना पुरेसा पुरवठा करणे, महागाईचा दर कमी करणे आणि सामान्य माणसाला दोन वेळा पुरेसे जेवण मिळेल, अंगभर वस्त्र मिळेल, त्याला निवारा मिळेल या दृष्टीने विविध योजनांची आखणी सुरू आहे.
याखेरीज महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. सर्वांसाठी आरोग्य आणि शिक्षण 2001पर्यंत साध्य करावे असे संयुक्त राष्ट्र संघटनेचे लक्ष्य होते. आजही सर्वांसाठी आरोग्य साध्य झालेले नाही. सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण आपण मान्य केले आहे. शिक्षणाचा अधिकार आपण सर्वांना दिला आहे. अजूनही निरक्षरतेचे प्रमाण संपूर्णपणे नष्ट झालेले नाही. शिक्षणाचे सर्वसमावेशक करताना ग्रॉस एन्रॉलमेंट रेशो म्हणजे सर्वसाधारण पटनोंदणी वाढवावी लागेल. 25 टक्के उच्च शिक्षण असावे असा दंडक आहे पण आपल्याकडे काही राज्यांत हे प्रमाण 17 ते 18 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. परंतु अद्यापही 25 टक्क्यांचे उद्दिष्ट साध्य केलेले नाही. आपल्या देशाला 1200 ते 1600 विद्यापीठांची गरज आहे पण आपल्याकडे 800 विद्यापीठे आहेत. भारतासारख्या देशात कृषी, उद्योग, शिक्षण ही महत्त्वाची शाश्वत विकासाची क्षेत्रे आहेत. तेव्हा या क्षेत्रात आपणास प्रकल्प रचताना पर्यावरणाचा विनाश न होता विकास कसा साध्य होईल यावर भर द्यावा लागेल. उद्योग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्राप्त करण्याची आवश्यकता आहे.
आपल्या एकूणच राष्ट्रीय विकासात आपल्या प्रजासत्ताकाला अधिक मजबूत बनवण्यासाठी काही उपेक्षित क्षेत्रांचा विचार करावा लागेल. त्यामध्ये या उपेक्षित क्षेत्रांपैकी पाणी, ऊर्जा आणि पर्यावरण यांचा विचार करावा लागेल. जागतिक तापमानबदलामुळे आपल्या राष्ट्रीय जीवनावर होणारे बदल टाळण्याकरिता आपल्या सुरक्षिततेची उपाययोजना करावी लागेल. ऊर्जानिर्मितीसाठी जे संकल्प केले आहेत ते पूर्णत्वास न्यावे लागतील. केवळ जलऊर्जेवर भर न देता सौरऊर्जा, पवनऊर्जा यांसारख्या पारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करून आपल्याला ऊर्जा प्रश्न सोडवावे लागतील. इंधनाचा वापर काटकसरीने करून भविष्यातील प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी समतोल धोरण अवलंबिले पाहिजे.
भारतीय प्रजासत्ताकाची आजवरची वाटचाल पाहता विकासाचे सामाजीकरण ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यातही आपल्या देशापुढे असलेल्या अनेक आव्हानांपैकी भ्रष्टाचार हे सर्वांत मोठे आव्हान आहे. पारदर्शक, नैतिक, जबाबदार असे प्रशासन या प्रश्नावर मात करू शकते.
लोकसंख्या वाढीचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. लोकसंख्या वाढ हा भार नसून ते वरदान आहे हे सिद्ध करायचे असेल तर आपल्या देशातील सर्वात महत्त्वाची शक्ती असलेल्या तरुणांचा विकास कसा करता येईल हे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन तरुणांच्या क्षमतांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत आधार असलेला तरुण वर्ग लोकशाही भक्कम करण्यासाठी पुढे सरसावेल. जगातील वैज्ञानिक शक्ती म्हणून भारत उदयास आला आहे. तेव्हा विज्ञान तंत्रज्ञानाच्याद्वारे आपणास समाजाचे आधुनिकीकरण आणि प्रगतीच्या वाटा शोधणारे आपले प्रजासत्ताक बलशाली ठरू शकेल.