भारताच्या इतिहासात एक महापुरुष 900 वर्षांपूर्वी होऊन गेले ते म्हणजे विश्वगुरू जगतज्योती महात्मा बसवेश्वर. आज त्यांची जयंती आहे.
महात्मा बसवेश्वर हे 12 व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली.
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात 1105 साली बसवेश्वरांचा जन्म झाला. जन्म वैशाखातील अक्षय तृतियेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मादीराज ऊर्फ मादरस हे बागेवाडी आगाराचे अग्रहार होते. वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून कूडलसंगम (जि. विजापूर) येथे ते निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कुडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाची मुलगी गंगांबिका यांच्याबरोबर झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.
महात्मा बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे नोकरीस सुरुवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता. त्या राजवटीत मंगळवेढा ही राजधानी होती. बसवेश्वर हे धनुर्विद्येसह इतर कलांत पारंगत होते. तसेच हुशार व चाणाक्ष असल्याने ते राज्याचे पंतप्रधान झाले. पुढे बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली. ते धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशांत आले. तेथे त्यांचा लिंगायात धर्म बऱ्यापैकी रुजला. लिंगायत संत व शरण महात्मा बसवेश्वरांना द्वितीय शंभु म्हणत.
बसवेश्वरांनी शिव हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कुडलसंगम येथील संगमेश्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. “ओम नमः शिवाय’ हा षड्क्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती. इ. स. 1167 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी ते संगमेश्वराशी एकरुप झाले. कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधीस्थळ उभारले आहे. महात्मा बसवेश्वरांना शतश: नमन.
– प्रकाश बिराजदार