जागतिक पातळीवर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. जमीन, जंगल, पाणी, हवा यांचे संरक्षण व संवर्धन करीत प्रदूषणाला रोखणे व पर्यावरण विषयक जनजागृती करणे हा त्यामागे प्रधान हेतू राहिला आहे.
पर्यावरण जनजागरण जैन धर्माच्या शिकवणीतून दिसून येते. 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी म्हटले होते की, “माणसाने माणसाची हत्या करणे ही हिंसा आहे आणि म्हणूनच ती करू नये. तसेच वृक्ष, वेली यांना देखील इजा पोहोचवू नका. कारण तीही एक हिंसाच असेल’. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही मानवजातीला उपकारक दृष्टीच भगवान महावीरांनी दिली होती. या विचारांचे पालन जैन धर्मीयांमध्ये आजही कसोशीने होताना दिसते.
पर्यावरणविषयक जगभर अनेक चळवळी झाल्या. त्यामध्ये भारतातील “चिपको’ आंदोलन सर्वात महत्त्वाचे आहे. वाढत्या शहरीकरणामुळे जंगले नष्ट करणे यास विरोध म्हणून 1974 पासून तेव्हाच्या उत्तर प्रदेश आणि आताच्या उत्तराखंड राज्याचा भाग असणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये झाडांची कत्तल होऊ नये यासाठी या झाडांनाच मिठी मारून झाडांचे संरक्षण करणाऱ्या हजारो महिलांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या साऱ्याचे नेतृत्व स्थानिक महिलांनीच केले. या चळवळीचे मार्गदर्शक भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी हे आंदोलन अनेक राज्यांमध्ये नेले.
सध्याच्या युगात पर्यावरणविषयक जागृती करणे ही अनिवार्य बाब ठरली आहे. मानवी जीवनावर पर्यावरणविषयक बदलांमुळे मोठा परिणाम होत आहे. ऋतुचक्र बदलले गेले आहे. खूप पाऊस, खूप उकाडा अथवा खूप थंडी असे अनुभवास येत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन सिमेंट क्रॉंकिटची जंगले बनलेली शहरे व त्यातील इमारतींमधून चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत. हे सारे आपण अनुभवत असताना कोविड-19 या विषाणूमुळे देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणविषयी अनेक चांगले बदल साऱ्या देशाने अनुभवले. वाहनांच्या धुरामुळे अनिष्ट परिणाम झालेली हवा शुद्ध झाल्याचे अनुभवास आले. हॉर्नचे गोंगाट कमी होऊन ध्वनिप्रदूषण कमी झाले.
कारखाने बंद राहिल्याने गंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाण्यातील प्रदूषण थांबले. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमध्येदेखील पहाटे पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येऊ लागली. पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगली अनुभूतीच आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर साथीचे अनेक रोग पसरायला मदत होते. सार्स, इबोला, निपा, चिकनगुनिया, मलेरिया, स्वाइन फ्लू आणि आता करोना हे सारे साथीचे रोग पर्यावरणाचे संरक्षण करता न आल्यामुळेच जगभर पसरले व वाढले. हे लक्षात घेता पर्यावरणाचे महत्त्व किती आहे हे कळून येते. यामुळेच पर्यावरणाची हानी कशामुळे होते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
ढासळत्या पर्यावरणाबद्दल विचार करताना ओझोनचा विरळ होत चाललेला थर, ग्रीनहाउस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग, वाळवंटामध्ये वाढ, जंगलाचे प्रमाण कमी, जैववैविध्यता कमी, कचऱ्याची विल्हेवाट आदी अनेक प्रश्नांची चर्चा होणे महत्त्वाचे असते.
ओझोनच्या थरावर परिणाम- पृथ्वीच्या वातावरणात जमिनीपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असणारा सुमारे 3 मिलीमीटर जाडीचा ऑक्सिजनचा दाट थर म्हणजेच ओझोनचा थर आता विरळ होण्याची भीती निर्माण झाली आहे. सूर्यापासून निघणारी अतिनिल किरणे या ओझोनच्या थरामुळे पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे मानवी आयुष्याला अतिदाहकता अथवा त्वचारोग यांपासून संरक्षण मिळते. जगातील अतिप्रगत देशांमध्ये होत असलेल्या औद्योगिक प्रदूषणामुळे फार मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू व वाहनांचा धूर वातावरणात मिसळत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या क्लोरो फ्लुरोकार्बन (सीएफसी)च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ओझोनच्या थरावर मोठा विपरीत परिणाम होतो.
ग्लोबल वॉर्मिंग- जगातील औद्योगिक प्रगतीमुळे मिथेन, सीएफसी, पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड म्हणजेच सर्व प्रकारच्या ग्रीन इफेक्ट गॅसेसमुळे पृथ्वीचे वातावरण तापत राहते व त्यातूनच निर्माण होणाऱ्या पृथ्वीच्या तापमानवाढीला “ग्लोबल वॉर्मिंग’ म्हटले जाते. यामुळे उत्तर व दक्षिण ध्रुवावरील लाखो किमी पसरलेले बर्फाचे थर वितळण्यास सुरुवात होऊन समुद्राच्या पातळीत काही सेंटीमीटरने वाढण्याचा धोका निर्माण होतो. याचा फार मोठा फटका समुद्रकिनारी वसलेल्या गाव व शहरांना बसतो.
वाळवंटामध्ये वाढ – पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे तसेच बेसुमार जंगलतोड यामुळे जमिनीचे वाळवंटात रूपांतर होणे वाढताना दिसत आहे. यासोबतच शेतीसाठी वाढत्या जमिनीची गरज व त्यामुळे होणारी वृक्षतोड यामुळे काही वर्षे शेती उत्पादन मिळते. मात्र, खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे या शेतजमिनींची उत्पादकक्षमता संपते व त्याचे रूपांतर वाळवंटात होते. जगातील सुमारे 35 टक्के म्हणजे 6.1 दशकोटी हेक्टर जमिनीवर वाळवंटाचा प्रभाव वाढला आहे. याचा फटका सुमारे 90 कोटी लोकांना बसला आहे.
जंगल क्षेत्रात घट- शेती, शहरीकरणाची गरज यामुळे जगात सुमारे 30 टक्के असणारे जंगल क्षेत्र आता घटत आहे. ब्राझील, मध्य-पश्चिम आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया खंड येथे घनदाट जंगले दिसून येतात. अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये लाखो एकर जमिनींवरील जंगले वणव्यांमुळे बेचिराख झाली आहेत. ही अनियंत्रित आग ग्लोबल वॉर्मिंगमुळेच वाढताना दिसत आहे.
जैववैविध्यतेत घट- जंगलाची बेसुमार तोड होत गेल्यामुळे अनेक प्रकारच्या वनस्पती तसेच अनेक प्रकारचे जीवजंतू व किडे यांचा नाश झाला असून अनेक प्रजाती संपूर्णपणे नष्ट होताना दिसत आहेत. पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या जैववैविध्याचा ऱ्हास होत असल्यामुळे पर्यावरणाचा देखील मोठा ऱ्हास होत आहे.
कचऱ्याचा प्रश्न गंभीर- आज जगामध्ये सांडपाणी व्यवस्थापन समाधानकारक नसल्यामुळे कोट्यवधी गॅलन सांडपाणी नदीत व समुद्रात प्रक्रिया न करताच सोडले जाते. कोट्यवधी टन कचऱ्याची निर्मिती रोज होत असूनही त्याची योग्य विल्हेवाट लावता न आल्यामुळे कचरा जमिनीत गाडला जातो व त्या कचऱ्यावर अंतर्गत प्रक्रिया होऊन त्यातील दूषित घटक जमिनीत मुरत राहतात. त्यामुळे आसपासच्या परिसरातील जमिनीखालील पाणी दूषित होते व विहिरींद्वारे हेच पाणी पिण्यासाठी वापरल्याने रोगराई वाढते.
पर्यावरणाला घातक अशा बाबींमुळे जंगले नष्ट होत आहेत, जमिनीखालील पाणी अधिक खोल जात आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. समुद्रात तेलगळतीमुळे लाखो टन खनिज तेल मिसळले जाते व हे खनिज तेल समुद्राच्या पाण्यात एकजीव होत नसल्यामुळे हजारो किमी पट्ट्यांमध्ये तरंगत राहते. त्यामुळे समुद्रातील मासे व जलसंपत्तीचा नाश होतो. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. पंजाब, हरियाणासारख्या राज्यांमध्ये शेतजमिनी कस वाढवण्यासाठी हिवाळ्यामध्ये लावलेल्या आगीमध्ये लाखो मेट्रिक टन धूर संपूर्ण दिल्लीत नव्हे तर संपूर्ण भारतात पसरतो व त्यात वाहनांच्या धुराची भर पडते. त्यातून फुफ्फुसाचे रोग जडतात. कडक उन्हाळा, कडक थंडी व अतिवृष्टी सारखे गंभीर प्रश्न उद्भवतात. अशा अनेक घातक गोष्टींमुळे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहे.
त्यामुळे पर्यावरणाकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे. शासनाबरोबरच जनतेनेदेखील पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊन भावी पिढ्यांच्या हाती अधिक चांगला निसर्ग, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी देण्याची गरज आहे. हे सारे महत्त्व जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अधोरेखित केले जाते. केंद्र व राज्य पातळीवर पर्यावरणपूरक कायदे करण्याची जबाबदारी व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावर असते. आपणही प्रत्येकाने पर्यावरणविषयक जागृती करून किमान एक झाड लावावे व ते जगवावे ही अपेक्षा आहे. त्यातूनच निसर्गाचे संतुलन राखले जाईल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत होईल.
– मिलिंद फडे, अध्यक्ष, जैन सहयोग