बंगळुरू – आमच्या कृतीने सोनियाजी दुखावल्या असतील तर आम्हाला माफ करा, अशी नरमाईची भूमिका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी घेतली आहे.
आम्ही सोनियांच्या नेतृत्वाला कधीच आव्हान दिलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसमध्ये ज्या पत्रावरून मोठे घमासान झाले आहे त्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये मोईली यांचाही समावेश होता.
तथापि, मोईली यांनी सोनियांना लिहिण्यात आलेल्या पत्रातील आशयाचे समर्थन केले असून त्यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या बळकटीकरणासाठीच आम्ही हे पत्र लिहिले आहे. हे पत्र माध्यमांना कोणी फोडले ते शोधून काढून त्यांना शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली.
पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या 23 नेत्यांपैकी एकाही नेत्याचा कॉंग्रेस सोडून जाण्याचा इरादा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोईली यांनी ही भूमिका मांडली आहे.