मुंबई – राज्यात राजकारणात गेल्या वर्षभरापासून राजकीय घडामोडी सुरु आहेत. गेल्या वर्षी शिवसेना गटातून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट वेगळा झाला.
आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आला. सत्ताधारी पक्ष राज्यात अधिक मजबूत झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.
राज्यातील 23 महानगरपालिकांची मुदत संपली असून त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तर राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात.
जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे.