नवी दिल्ली -भारतीय कुस्तीगीर महासंघाची निवडणूक येत्या 6 जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तत्कालीन अध्यश्र ब्रिजभूषण शरण सिंह यांना जरी या निवडणुकीत उभे राहता येणार नसले, तरीही त्यांचा मुलगा करण व जावई हे दोघेही ही निवडणूक लढवू शकणार आहेत. त्यामुळे महासंघावर पुन्हा एकदा ब्रिजभूषण यांचाच वरचष्मा राहणार असल्याचे समोर येत आहे. तसेच अद्याप पोलिसांच्या चौकशी अहवालात ब्रिजभूषण यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नसल्याने ते आपला कार्यकाळही पूर्ण करणार का, असेही चित्र निर्माण झाले आहे.
ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध भारताच्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध एफआयआरही दाखल केली होती, तसेच त्यांच्या अटकेची मागणी करत आंदोलनही छेडले होते. या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना पदावरून हटवण्याचीदेखील मागणी केली.
जम्मू-काश्मीरचे निवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता 6 जुलैला संघटनेतील सर्व पदांसाठी मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कुस्ती संघटनांना प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 जून आहे. यानंतर 22 जूनपर्यंत या अर्जांची छाननी करण्यात येईल.
ब्रिजभूषण यांचेच वर्चस्व राहणार
ब्रिजभूषण स्वतः या निवडणुकीत सहभागी होऊ शकणार नसले तरीही त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा सहकारी निवडणूक लढवू शकतात. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंना आश्वासन दिले आहे की, ब्रिजभूषण यांचा कोणताही नातेवाईक निवडणूक लढवणार नाही. मात्र, त्यांचा मुलगा व जावई या निवडणुकीसाठी पात्र ठरत आहेत. करण हे कार्यकारिणीत उपाध्यक्ष होते. तसेच ते उत्तर प्रदेश कुस्ती परिषदेचे सदस्यही आहेत. ब्रिजभूषण यांचे जावई विशाल सिंह बिहार कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. ते दोघेही राज्याचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवण्यास पात्र ठरत आहेत.
प्रत्येक राज्याचे दोन प्रतिनिधी
भारतीय कुस्ती महासंघाशी सल्लग्नित असलेली प्रत्येक राज्य कुस्ती परिषद दोन सदस्य पाठवू शकतात. प्रत्येक प्रतिनिधीचे एक मत असेल. यानुसार भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 50 मते होतील. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बरखास्त केलेल्या केलेल्या राज्य कुस्तीगीर परिषददेखील निवडणुकीत भाग घेण्यासाठी आपला दावा सादर करू शकतील.
2 जुलैला अंतिम यादी
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 23 जूनपासून सुरू करण्यात येणार असून, 25 जून ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर अर्जांची छाननी 28 जूनला होणार आहे. उमेदवार 28 जूनपासून 1 जुलैपर्यंत आपला अर्ज मागे घेऊ शकतात. यानंतर 2 जुलैला निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.