नवी दिल्ली – भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढलेला आहे. पूर्व लदाखमध्ये हा तणाव अधिक आहे. मात्र अशा स्थितीत देखील भारतीय सैन्याने दाखवलेल्या मोठेपणामुळे भारतीय सैन्याचे कौतुक होत आहे. भारतीय हद्दीत पकडण्यात आलेल्या चिनी सैनिकाला भारतीय सैन्याने चीनला सोपविले.
चिनी सैनिकाला भारतीय हद्दीत 8 जानेवारी रोजी पकडण्यात आले होते. त्याला पूर्व लदाखमधील पेंगॉन्ग झीलच्या दक्षिण किनाऱ्यावर पकडले होते. सोमवारी या सैनिकाला चुशुल-मोल्डो पॉइंटवर चीनला सोपविण्यात आले. चीनने मागील वर्षी केलेल्या कुरापतीनंतर एलएसीजवळ दोन्ही देशांकडून मोठे सैन्य तैनात करण्यात आलेले आहे.
दरम्यान अंधार आणि अवघड भौगोलिक स्थिती यामुळे सैनिक रस्ता भटकला होता. त्यामुळे भारतीय सैन्याने उभय देशांमध्ये झालेल्या कराराचे काटेकोर पालन करून रस्ता चुकलेल्या चीनच्या सैनिकाला लवकरात लवकर परत पाठवावे. जेणेकरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव कमी राहिल. तसेच शांतता स्थापन करण्यासाठी मदत होईल, असही चीनने म्हटले होते.
पीएमए येथे पकडण्यात आलेल्या सैनिकाला करारात ठरल्याप्रमाणे वागणूक देण्यात येत आहे. तसेच त्या सैनिकाने कोणत्या परिस्थितीत एलएसी सीमा पार केली होती, याचा तपास करण्यात येत असल्याचे भारतीय सैन्याची वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मागील तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरला भारतीय सैनिकांनी चीनच्या जवानाला पकडले होते. त्या सैनिकाला देखील चीनला सोपविण्यात आले होते.