माळशिरस : दुष्काळी भागाला निरा देवधर धरणाचे पाणी तात्काळ मिळावे, या मागणीसाठी आज शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस म्हसवड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी दुष्काळी माळशिरस तालुक्यातील जवळपास पाच ते सात हजार शेतकरी उपस्थित होते. नीरा देवधर हे जगातील पहिले असे धरण आहे की जे बनवून ४५ वर्षे झाली तरी त्याला कालवेच न काढल्याने त्याचा फायदा दुष्काळी भागाला होत नसल्याची टीका यावेळी जानकर यांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात सत्ताधाऱ्यांनी एक वर्षात पाणी देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजूनही याच्या शिंगोर्णी गावापर्यंतच्या निविदा निघालेल्या नाहीत. आम्ही शासनाला दिवाळीपर्यंतची मुदत दिली असून २०२५ पर्यंत पाणी न आल्यास सर्व दुष्काळी भागातली शेतकरी मंत्रालयाला वेढा घालतील आणि या कामाची निविदा घेऊनच परत येतील, असा इशारा आमदार उत्तम जानकर यांनी दिला आहे. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारकडून याप्रकरणी केवळ धुळफेक केली जात असून या कामांना कोणतेही आर्थिक बजेट दिले नसल्याचा आरोप केला आहे. उजनीच्या प्रदूषित पाण्याच्या बाबतीत केंद्राच्या व राज्याच्या प्रदूषण मंडळासह जलसिंचन विभागाला अनेक वेळा पत्रे देऊनही केंद्रीय प्रदूषण मंडळांनी उत्तर दिले. मात्र राज्य सरकारच्या मंगरूळ अधिकाऱ्यांनी याला उत्तर न दिल्याने उद्या लोकसभेत राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाणी अत्यंत प्रदूषित झाल्याने लाखो लोकांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. याबाबत राज्य प्रदूषण मंडळ व केंद्राच्या प्रदूषण मंडळाला लेखी पत्र दिले होते. केंद्राच्या प्रदूषण मंडळांनी पावसाळा संपल्यानंतर पाण्याच्या तपासणीसाठी पथके पाठवणार असल्याचे सांगितले असून त्यानंतर उजनीचे पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र लोकसभा सचिवांनी दोन वेळेला राज्य सरकारला पत्र देऊनही त्याची उत्तरे मगरुर अधिकारी व प्रशासनाने दिलेली नाहीत. लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची मुजोरी या अधिकाऱ्यांमध्ये येते कशी आणि यांचा पाठीराखा कोण असा सवाल करीत याबाबत उद्या मुख्य सचिवांवर लोकसभेमध्ये हक्कभंग आणणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.