मागणीनुसार पुरवठा करण्यावर आंबा व्यापाऱ्यांचा भर
पिंपरी – देशभरात सध्या सुरू असलेला लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यावर आलेली बंधने यामुळे नागरिकांचा कल सध्या घरपोच भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू मागविण्याकडे वाढला आहे. त्याशिवाय, आता काही आंबा व्यापाऱ्यांनी थेट सोसायट्यांशी संपर्क साधत मागणीनुसार रत्नागिरी, देवगड हापुस आंबा घरपोच पोहचविण्याचे काम विक्रेत्यांनी हाती घेतले आहे.
करोनाचा संसर्ग वाढल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घरपोच सुविधा दिल्यास त्यांची गैरसोय दूर होऊ शकणार आहे. हीच बाब हेरून आंबा विक्रेत्यांनी सोशल मिडियावरून सोसायट्यांमध्ये आंबा घरपोच करण्यात येईल, असे मेसेज फिरविले जात आहेत. सोसायटीतील रहिवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मागणी नोंदविलेल्या सोसायट्यांनी संपर्क केल्यानंतर त्यांना सरासरी पाच दिवसाने आंबा पाठविला जातो.
देवगड हापुसची 4 ते 6 डझनाची पेटी सध्या 2200 ते 2400 रुपयांना विकली जात आहे. तर, रत्नागिरी हापुसची 4 ते 7 डझनाची पेटी 2500 ते 2800 रुपये दराने विकण्यात येत आहे. सोसायटीतील दोघे-तिघे एकत्रितपणे अशा पेट्या विकत घेतात. तसेच, आंबा विक्रेत्यांना ऑनलाईन पेमेंट केले जाते. 2 डझन पेट्यांची मागणी तुलनेत कमी असते. सुमारे 1200 ते 1300 रुपयांमध्ये देवगड व हापुसच्या 2 डझन आंब्यांच्या पेट्या मिळतात.