“…तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा “; मणिपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिल्यानंतर भाजप आमदार संतप्त

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकजण या घटनेवर संतप्तपणे प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खुद्द सर्वोच्च न्यायालयाने घटनेची दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तर न्यायालयाने सरकारला या प्रकरणाविषयी गंभीर दखल घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपच्या आमदाराने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मणिपूरच्या महिलांवरील अत्याचार प्रकरणी आदेश देताना, “आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. कालचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. या प्रकाराबाबात आम्ही चिंता व्यक्त करतो. सरकारने पुढे येऊन पावलं उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे.” असे कठोर शब्दात म्हटले होते. त्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी नाराजी नोंदवली आहे. त्यांनी याविषयी एक ट्विट करत सर्वोच्च न्यायालयानेच मग देश चालवावा असे वक्तव्य केले आहे.

अतुल भातखळकर यांनी यासर्व प्रकरणावर आपल्या ट्विटमध्ये, “सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा… कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.” असे म्हटले आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झाली नव्हती. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर आज सकाळी या प्रकरणातल्या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर आणखी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.





